वसई : शहरातील बाजारपेठांमधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने बाजारपेठांमध्ये जैवइंधन टाकी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर अंबाडी रोड येथील बाजारपेठेत दोन जैवइंधन टाक्या बसविल्या जाणार आहेत. शहरातील ओल्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल होऊ लागली आहे. कचरा भूमी अपुरी पडू लागल्याने ओल्या कचऱ्याचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. कचराभूमीत दररोज साडेसातशे मेट्रीक टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे सर्व प्रयोग अयशस्वी ठरू लागले आहे. अशा वेळी कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करणे हा पर्याय असल्याचा एक निष्कर्ष समोर आला आहे. त्यासाठी ओल्या कचऱ्याची आहे त्या ठिकाणी व्हिल्हेवाट लावून खतनिर्मिती करण्याचे पालिकेने ठरवले आहे. त्यासाठी विविध प्रयोगांवर पालिकेने काम सुरू केले आहे. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून त्यापासून खत तसेच इंधन तयार करण्यासाठी केरळ येथे तयार करण्यात आलेली जैवइंधन टाकी शहराली विविध ठिकाणी बसविण्याचा पालिका विचार करत आहे. प्रायोगिक तत्वावर बाजारपेठांमध्ये ही जैवइंधन टाकी बसविण्यात येणार आहे. वसईच्या अंबाडी रोड येतील बाजारपेठेत दोन जैवइंधन टाक्या लावण्यात येणार आहे. एक जैवइंधन टाकी ही ३० किलो क्षमतेची असणार आहे. नवघर माणिकपूर प्रभाग समितीच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांनी जागेची पाहणी केली आहे. याबाबत तांत्रिक माहिती तपासली असून अहवाल आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली. या जैवइंधन टाकीत ओला कचरा टाकल्यावर टाकीतील विषाणू कचऱ्यावर प्रक्रिया करतात आणि त्या कचऱ्याचे रूपांतर द्रव खतात होते तसेच स्वयंपाकाचा गॅस तयार होतो. आयुक्त गंगाथरन डी. यांनी शासकीय निवासस्थानात जैवइंधन टाकी बसवली आहे. त्यातून गॅस आणि खत निघत आहे. आयुक्तांनी प्रत्यक्ष खात्री केल्यानंतर बाजारपेठांमध्ये जैवइंधन टाकी बसविण्याचा निर्णयम् घेण्यात आला आहे. अंबाडी रोड येथील बाजारपेठांमधील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर इतर बाजारपेठांमध्ये अशी टाकी बसविण्यात येईल असे आयुक्त गंगाथरन डी यांनी सांगितले. बाजारपेठांमध्ये दररोज मोठय़ा प्रमाणावर कचरा तयार होतो. जैवइंधन टाक्यांमध्ये हा कचरा टाकल्यानंतर त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट होईल आणि ओल्या कचऱ्याची समस्या दूर होईल, असे त्यांनी सांगितले. पालिकेचे तत्कालीन आयुक्त बी.जी. पवार यांनी या जैवइंधन टाकीला मान्यता दिली होती. त्यानंतर पालिकेच्या दहा उद्यानात या जैवइंधन टाक्या बसविण्यात आल्या होत्या. काय आहे जैवइंधन टाकी जैवइंधन टाकी (बायोगॅस टॅंक) ही केरळात तयार करण्यात आली आहे. ही फायबरची टाकी असून त्याच्या तळाशी विषाणू तयार करून सोडले जातात. टाकीत ओला कचरा पाण्यात मिसळून टाकल्यानंतर २४ तासात विषाणू कचऱ्यावर प्रक्रिया करतात. त्यानंतर द्रवरूपी खत आणि स्वयंपाकाचा गॅस तयार होतो. खतासाठी आणि गॅससाठी टाकीमध्ये स्वतंत्र तोटी देण्यात आलेली आहे. ही जैवइंधन टाकी सूर्यप्रकाशावर काम करते. त्याला कुठल्याही प्रकारच्या विद्युत जोडणी अथवा बॅटरीची गरज नसते.