कोल्हापूर : पंचगंगा नदीला पूर आल्याने केवळ नागरिकांनाच नव्हे तर पक्षीमात्रांनाही त्याचा फटका बसत आहे. रुई (ता.हातकणंगले) येथील नदी रोडवरील मगदूम विहिरीलगतच्या झाडावर चिमण्यांनी पंचवीसहून अधिक घरटी बांधली आहेत, पण पुराच्या वाढत्या पाण्यामुळे त्यातील काही घरटी बुडण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे घरट्यातील पिलांबाबत पहाटेच्या सुमारास चिमण्यांची घालमेल चालू होती.

शुक्रवारी पंचगंगा जलतरण आणि मॉर्निंग वॉक मंडळाच्या सदस्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. आपल्या पिलांच्या काळजीपोटी चिमण्यांची सुरु असलेली धडपड सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब फास्के आणि शकील मुजावर यांनी मोबाईलवर चित्रित करून घरटं चाललं पाण्याखाली जीव कासावीस होतो! पूरग्रस्त आम्हीही पण लक्षात कोण घेतो!! या मथळ्याखाली सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.
माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी धनंजय पाटील यांनी कोल्हापूरच्या डिझास्टर रेस्क्यू लाईफ गार्ड सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्याशी संपर्क साधला.

कांबळे यांनी अमित पाटील (टोप ), अर्जुन भोसले (टोप), सुरेश कांबळे (कोल्हापूर) या सहकाऱ्यांसह पुराच्या पाण्यात उतरुन दोरीच्या मदतीने अडीच – तीन तासांच्या प्रयत्नानंतर चिमण्यांची घरटी जवळपास चार फुटांनी उंचावर घेतली. यामुळे सर्वच घरट्यातील पिलांना जीवदान तर मिळाले. त्यांना तैमुर उर्फ अब्दुल मुजावर, नंदकुमार साठे यांनी मदतीचा हात पुढे केला. चिमणीपाखरांविषयी दाखवलेली संवेदना उल्लेखनीय ठरली आहे.