राज्यातील ज्या मतदारसंघांत सतत हार पत्करावी लागली, अशा १९ मतदारसंघांसाठी आता विशेष रणनीती ठरविण्यात येत आहे, तसेच तडजोडीच्या जागांवर आव्हानाचा बिगुल वाजवता यावा, असे वातावरण निर्माण केले जाणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. बारामती, लातूर, नांदेड, भोकर या तडजोडीच्या जागांवर भाजपने दावा सांगण्याचे ठरविले आहे.
सतत पराभूत होणाऱ्या १९ जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी व्हावा, म्हणून प्रत्येक नेत्याला एक मतदारसंघ दत्तक देण्याची योजना भाजपने स्वीकारली आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मत्र करारात काही मतदारसंघांत तडजोड केली जात असे. मित्राच्या मतदारसंघात मित्रपक्षाला पाठवायचे किंवा काँग्रेसचा उमेदवाराचा विजय सोपा व्हावा, असा उमेदवार दिला जात असे. लातूर व परळी हे मतदारसंघ याच तडजोडीचा भाग मानले जात. बारामतीचेही तसेच होते.
मराठवाडय़ातील काही जागा आवर्जून शिवसेनेकडे दिल्या जात. भोकर मतदारसंघाची अवस्थाही अशीच. विलासराव, गोपीनाथ मुंडे यांचे मतदारसंघ त्यांच्या वारसांसाठी ‘राखीव’ झाले, तेव्हाही ही तडजोड पद्धतशीर स्वीकारली गेली. या जागांवर निवडणूकच लढवायची नाही, अशी भूमिका भाजप घेत असे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात ‘अॅडजेस्टमेंट’च्या जागा अशी शब्दावली रूढ झाली.
बीड जिल्हय़ात परळीची जागा भाजपकडे असते. बाकी सर्व जागा शिवसेना लढविते. त्यामुळे अशा तडजोडीच्या जागांसाठी विशेष रणनीती ठरविण्यात येणार आहे. किमान आव्हान उभे राहील असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच आता लातूरचे अमित देशमुख व भोकरच्या उमेदवारांना निवडणुकीच्या िरगणात लुटुपुटुची लढाई खेळता येणार नाही, असे बोलले जात आहे. अर्थात, प्रत्यक्ष जागावाटपात हा तिढा कसा सोडवला जातो, यावर बरेच अवलंबून असेल. त्यामुळे तडजोडीच्या ज्या जागा शिवसेना लढवत असे, त्यापैकी काही जागा भाजप मागणार असल्याचे सांगितले जात आहे. अगदी बारामतीची जागाही भाजपला मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, परळीची जागा काँग्रेस आवर्जून मागून घेत असे. या जागेवर आता राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. येथून गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या निवडणूक लढवितात, तर लातूर व नांदेडच्या जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. सातत्याने हार पदरी येणाऱ्या जागांसाठी एक नेता, अशी रणनीती ठरविण्यात आली असून तेथे लागणारी सर्व ‘रसद’ त्या नेत्याने जमवायची, असेही ठरविले जात आहे. मराठवाडय़ात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १९ जागा लढविल्या होत्या. त्यापकी केवळ पंकजा पालवे व उदगीरचे सुधीर भालेराव हे दोघेच निवडून आले होते.