राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून यासाठी ठाकरे सरकारकडून वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जात आहे. राज्य सरकारकडून एकीकडे कंपन्यांशी चर्चा केली जात असताना इतर राज्यांमधून ऑक्सिजन कसा आणता येईल यासाठी केंद्राकडे मदत मागितली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांत ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे हाल सुरू आहेत. दरम्यान यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. "ऑक्सिजन नसल्यामुळे कंदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व करोना रुग्णांना घरी पाठवण्यात आलं. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार करोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करत आहे," अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. ऑक्सिजन नसल्यामुळे कंदिवलीतील ESIC हॉस्पिटलमधून सर्व कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. परिस्थिती भीषण आहे आणि महाराष्ट्रातले बोलबच्चन ठाकरे सरकार कोरोना थैमानाचा सामना ट्विटर आणि फेसबुकवरून करते आहे. — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2021 मुंबई पालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालय, कुर्ला येथील भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल, जोगेश्वारीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयांतील ऑक्सिजनचा साठा संपुष्टात आला. त्यामुळे तेथील १६८ रुग्णांना इतर रुग्णालये आणि करोना केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. मुंबई महापालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार अतिदक्षता विभागातील एकूण २,७११ पैकी केवळ ३७, तर व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या १,३५८ पैकी केवळ १७ खाटा शिल्लक आहेत. ऑक्सिजनची सुविधा असलेल्या १,१९५ खाटा रिकाम्या आहेत. मुंबईतील पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासन, तसेच ऑक्सिजन उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी पालिकेने सहा समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह सर्व अतिरिक्त आयुक्त परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. रुग्णसंख्या जास्त असलेल्या नागपूर, पुणे, नाशिक, नगर, सांगली, लातूर आदी जिल्ह्यांमध्येही ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये नगर जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असताना मागणीच्या तुलनेत निम्माच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. लवकरात लवकर पुरेसा प्राणवायू उपलब्ध न झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराच नगरमधील वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेने सरकारी यंत्रणांना शनिवारी दिला. मुंबईत सहा रुग्णालयांतील १६८ रुग्णांचे स्थलांतर मुंबई महापालिकेच्या सहा रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा साठा संपुष्टात आल्यामुळे तेथील तब्बल १६८ करोनाबाधित रुग्णांना अन्य रुग्णालये आणि करोना केंद्रांमध्ये हलवावे लागले. पालिकेची सर्व रुग्णालये आणि करोना केंद्रांमध्ये प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेची कसरत सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांशी संपर्काचा प्रयत्न, पण… महाराष्ट्रातील करोना रुग्णांसाठी ऑक्सिजन अपुरा पडत असल्याने वाढीव साठा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क साधला होता. मात्र, ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यग्र असल्याने संवाद होऊ शकला नाही. नंतर संपर्क साधण्यात येईल, असे पंतप्रधान कार्यालयाकडून कळवण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील उद्योजकांच्या बैठकीत दिली. ऑक्सिजनची राज्याला खूप गरज असून, सध्या उत्पादित होणारा सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणास्तव वापरला जात आहे. रुग्णसंख्या पाहता आणखी ऑक्सिजनची गरज भासत असून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे कळविले आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न केला होता. मात्र ते पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यग्र असल्याने संवाद झाला नाही. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य मिळत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांशी संवाद साधताना नमूद केले. मात्र, यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात पुन्हा जुंपली आहे.