जयंत पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत नाराजी जाहीर केल्यानंतर अखेर जलसंपदा प्रकल्पांच्या कामांच्या यादीला प्रशानाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात गेल्या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत यावरुन वाद झाला होता. दरम्यान यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

कॅबिनेट बैठकीत खडाजंगी, जयंत पाटील का संतापले?; अजित पवारांचा काय संबंध?

“राष्ट्रवादीच्या हटवादासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झुकावे लागले आहे. जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना अखेर प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार. शिवसेना ०, राष्ट्रवादी १,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

काय झालं होतं –
जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव विजयकुमार गौतम यांना पुन्हा त्याच जागेवर नियुक्ती देण्याचा आग्रह मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी नियमांवर बोट ठेवून फेटाळला होता. त्यानिमित्ताने जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव कुंटे व त्यांना पाठिंबा देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक शीतयुद्ध सुरू झाले. त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले होते. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या १२ मे रोजी झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील हे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर पुन्हा संतापले होते. जलसंपदा विभागाच्या आधीच मंजूर प्रकल्पांची यादी मंजुरीसाठी पुन्हा वित्तविभागाकडे कशासाठी पाठवली. असे होणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करा, असा संतप्त सूर जयंत पाटील लावत त्यांनी कुंटे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

त्या प्रकल्पांची फाइल आता मंजूर झाल्याचे सांगण्यात आलं आहे. जलसंपदा विभागाची ती मंजूर प्रकल्पांची यादी ही रखडलेले प्रकल्पांची यादी होती. काम पुन्हा सुरू करतानाचा प्राधान्यक्रम त्यात होता. राज्याच्या अर्थसंकल्पातून त्यासाठी निधी दिला जाणार आहे.

ती फाइल मुख्य सचिव कुंटे यांच्याकडे गेल्यावर ती त्यांनी वित्तविभागाकडे पाठवली होती. मागील मंत्रिमंडळ बैठकीत त्यावरून वाद झाल्यानंतर मुख्य सचिव कुंटे यांनी जलसंपदा विभाग आणि विधि व न्याय विभागाच्या सचिवांसह बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्या फाइलला हिरवा कंदील दाखवला.