रत्नागिरी : नाणार येथील प्रस्तावित तेलशुध्दीकरण प्रकल्पाच्या समर्थनासठी आज शनिवारी येथे काढण्यात येणा-या मोर्चाच्या भूमिकेला सत्ताधारी भाजपाने पािठबा व्यक्त केला आहे, तर प्रकल्पाला सतत विरोध केलेले शिवसेनेचे नेते थंड पडले आहेत.

या मोर्चाच्या विरोधातील प्रकल्पग्रस्तांचा प्रतिमोर्चाही बारगळला आहे.

गेल्या मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सत्ताधारी भाजपाने राज्यात शिवसेनेशी युती राखण्यासाठी सेना नेत्यांच्या हट्टाखातर हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात हलवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण निवडणुका पार पडल्यानंतर नियोजित प्रकल्प पुन्हा नाणारमध्येच आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. कोकण विकास समिती या अराजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मंडळी एकत्र येत उद्या येथे प्रकल्प समर्थकांचा मोर्चा आयोजित केला आहे.

या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला असता, नाणार प्रकल्प  होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून ते म्हणाले की, स्थानिक जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन केले जाईल. पण औद्योगिक प्रगतीच्या आड कोणी येऊ नये. युवकांना रोजगार देण्यासाठी, विकास द्रुतगतीने होण्यासाठी असे प्रकल्प होणे गरजेचे आहे. प्रदीर्घ काळ आपण औद्योगिक प्रकल्प नाकारत राहिलो तर  खूप नुकसान होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वासार्ह चेहेरा कोकणच नुकसान होऊ देणार नाही यव्ही खात्री जनतेने बाळगावी, असे माझे आवाहन आहे.

आम्ही जनतेबरोबर, अशी भूमिका घेत प्रकल्पाला सुरवातीपासून विरोध केलेल्या शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर स्थानिक आमदार राजन साळवी यांनी फोन घेतला नाही. या दोघांना पाठवलेल्या लघुसंदेशावरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान प्रकल्पविरोधी संघर्ष समिती आणि भूमीकन्या महामंडळाच्या पदाधिका-यांनी प्रकल्पाला विरोधाची भूमिका पुन्हा एकवार जाहीर करून उद्या प्रतिमोर्चाची घोषणा केली होती. पण पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी समजूत काढल्यामुळे तो मागे घेत असल्याचे गुरूवारी संध्याकाळी जाहीर केले. त्यामुळे प्रकल्प समर्थकांचा नियोजित मोर्चा उद्या निर्वेधपणे पार पडेल, अशी चिन्हे आहेत .

शहरातील मारुतीमंदिर सर्कलपासून सकाळी ११ वाजता सुरू होणारया या मोर्चामध्ये रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तीन तालुक्यांमधील व्यापारी संघटना, बांधकाम उद्योग संघटना, हॉटेल उद्योजक, वाहन सेवा व दुरुस्ती उद्योग आणि अन्य विविध व्यावसायिकांच्या संघटना सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चाच्या वतीने निवेदन दिल्यानंतर सांगता होणार असल्याचे या संदर्भात कोकण विकास समितीतर्फे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.