काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेत आहे. शिवसेनेच्या बदल्यात मनसेला जागा करुन दिली जात आहे असा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “काँग्रेसने योग्य प्लॅन करुन शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस तुम्हाला हिंदुत्वापासून दूर नेत आहे. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात हिंदुत्त्ववादी म्हणून मनसे आणि भाजपा येत आहे याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. हिंदुत्त्व सोडलं नसेल तर शिवेसेनेने राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) समर्थन द्यावं असं आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

सावकरांवर गलिच्छ आरोप झाले तेव्हा शिवसेना शांत का बसली?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून गलिच्छ आरोप झाले तेव्हा शिवसेना शांत का बसली होती ? अशी विचारणाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. काँग्रेस सेवा दलाच्या निवासी शिबिरात वाटलेल्या पुस्तिकेत नथुराम गोडसे आणि सावरकर यांच्यात शारीरिक संबंध असल्याचा खळबळजनक उल्लेख करण्यात आला होता. त्याच पार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांनी ही विचारणा केली.

आणखी वाचा – सावरकरांवर गलिच्छ आरोप झाले तेव्हा शिवसेना शांत का बसली ?, चंद्रकांत पाटील यांचा सवाल

आशिष शेलार यांना माफी मागण्यास सांगितलं
यावेळी त्यांना आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना आक्षेपार्ह भाषा वापरण्यासंबंधी विचारलं असता, आम्ही आशिष शेलार यांना तात्काळ दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं होतं असं सांगितलं. “मी त्यावेळी दिल्लीत होतो. माझ्यापर्यंत माहिती पोहोचताच आशिष शेलार यांना फोन करुन दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितलं. त्यामुळे हा विषय संपला आहे,” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

योजना प्रलंबित ठेऊ नका
राज्य सरकारकडून योजना रद्द केल्या जात असल्याच्या निर्णयावर टीका करताना चंद्रकांत पाटील यांनी सरकारने जुनं रद्द करण्यास काही हरकत नाही पण त्याला पर्याय दिला पाहिजे असं मत व्यक्त केलं. “वर्षभर चौकशी करुन योजना प्रलंबित ठेवल्या जाऊ नयेत. घोटाळा झाला असेल तर चौकशी करुन कारवाई करा आणि काम सुरु करा,” असं त्यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार ?
यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवणार असल्याची चर्चा सुरु असल्याबद्दल विचारलं. यावर चंद्रकांत पाटील यांनी अशी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं.

दिल्लीत बदल होणार हे निश्चित
दिल्ली विधानसभा निवडणुकीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, “दिल्लीमध्ये सुरुवातीला काही दिवस आम आदमी पक्षासाठी वातावरण चांगलं होतं. पण गेले काही दिवस मोदी आणि शहा यांच्या मोठ्या सभा झाल्या आहेत.