भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर वाद निर्माण झाला असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेलं चालतं का? अशी विचारणा करताना ही महाष्ट्राची संस्कृती नाही असं ते म्हणाले आहेत. सोबतच पडळकरांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे असंही ते म्हणाले आहेत. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. “गोपीचंद पडळकर एक समजूतदार कार्यकर्ता आहेत. त्यांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. इतक्या जुन्या प्रकरणावर पत्रकारांना प्रश्न विचारण्याची तशी गरज नव्हती. शरद पवार यांनी छोट्या जातीला महत्त्व दिलं नाही असा अनुभव त्यांना आला असेल म्हणूनच त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. शरद पवारांचा अनादर व्यक्त करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. फडणवीस यांनी पडळकर यांना शब्द जपून वापरण्याची समज दिली आहे," असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील यांनी विरोधकांनाही खडे बोल सुनावले. "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतो. आम्हाला कसलीही टोपण नावं ठेवली जातात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामे जरूर केली. परंतु तुम्ही अग्रलेखामध्ये काय लिहिता? त्यातली तुमची भाषा कसली आहे?," असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर शरसंधान केले. "राजकारणात निश्चितपणे शब्द जपून वापरले पाहिजेत. अन्यथा त्याची जखम खूप दिवस राहते. गोपीचंद पडळकर चुकला म्हणून इतरांनी काहीही बोलू नये. कोणी काहीही बोलले तरी चालते का ? असा सवाल करत त्यांनी सर्वांनीच राजकीय संस्कृतीचे जतन करायला हवे," असा सल्लाही दिला.