शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्च होते. दोन-अडीच तास चहा बिस्कीटावर तर चर्चा होणार नाही असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती असल्याचा दावा केला आहे.

“जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार. तर ते दोन ते अडीच तास एकत्र बसले असतील तर चहा बिस्किटावर चर्चा करणार नाहीत. पण ही कोणतीही निर्णयात्मक बैठक नव्हती,” अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती
दरम्यान मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य केलं. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- शरद पवारांनी NDA सोबत यावं, शिवसेनेसोबत राहण्यात काही फायदा नाही – रामदास आठवले

“पैसे किंवा खर्च हा एकमेव मुद्दा नसतो तर खूप वेळ जातो, अनिश्चतता असते. आज निवडून आलेले आमदार उद्या असतील की नाही ते ठाऊक नसतं. त्यामुळे मध्यावधी निवडणुका कुणालाच नको आहेत. पण अस्थिरतेमधून मार्ग कसा काढायचा हे पण लक्षात येत नाही. मध्यावधी निवडणूक होऊ नये म्हणून सगळेच प्रयत्न करतील. पण शेवटी कुणाचीच कॉम्बिनेशन जुळली नाहीत, तर काहीही पर्याय उरणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.