चंद्रपूरमध्ये एकहाती सत्ता; काँग्रेसचे बळ निम्म्यावर; बहुजन समाज पक्षाला आठ जागांवर यश

लोकसभा निवडणुकीपासून विदर्भात निर्माण झालेल्या लाटेचा भाजपला चंद्रपूरमध्येही फायदा झाला असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी गेल्या अडीच वर्षांत केलेली विकास कामेही उपयोगी पडली. गटबाजीचा काँग्रेसला फटका बसून गतवेळच्या तुलनेत संख्याबळ निम्म्यावर आले. बहुजन समाज पक्षाची उत्तर प्रदेशात वाताहत झाली असली तरी चंद्रपूरमध्ये आठ जागा जिंकल्याने रिपब्लिकन पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जाते.

लोकसभा, विधानसभा, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत व पंचायत समिती अशा सलग सहा निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर महापालिकेतही भाजपने ३६ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली. यापूर्वी पालिकेत भाजपचे केवळ १८ सदस्य होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६०० कोटींची विकास कामे या जिल्हय़ात खेचून आणली. त्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार नाना शामकुळे यांची चांगली साथ मिळाली. भाजपच्या या तिन्ही नेत्यांमध्ये मतभेद असले तरी ते सार्वजनिक होऊ न देता फक्त विकास कामांचीच चर्चा केली. त्याचा परिणाम भाजपला निर्विवाद यश संपादन करता आले. मुनगंटीवार यांनी तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वन अकादमी, बाबुपेठ उड्डाणपूल, नाटय़गृह, अटल अमृत पाणीपुरवठा योजना, सिमेंटीकरण, डांबरीकरण, नालेसफाई, वायफाय सिटी, रामाळा तलाव, बगीचे आणि मोकळ्या जागांचा विकास अशा असंख्य विकासकामांचे मुद्दे जाहीर सभांमधून लोकांपर्यंत पोहचविले. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, तेव्हा तुम्ही महापालिकेतही पूर्ण सत्ता द्या, आम्ही यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने विकास करून दाखवू, असे मुनगंटीवार यांनी सर्वच जाहीर सभांत सांगितले. विशेष म्हणजे लोकांना प्रत्येक गल्लीबोळात हा विकास डोळ्यांनी दिसत होता. भाजपचे तिकीटवाटपाचे सूत्र काही प्रभागात चुकले. काही आयाराम-गयाराम यांना उमेदवारी दिल्या गेली. त्याचा परिणाम काँग्रेसमधून शेवटच्या क्षणी भाजपत आलेले रामू तिवारी यांचा दारुण पराभव झाला. तर काही प्रभागांत ज्यांची निवडून येण्याची क्षमता नाही अशांनाही उमेदवारी अक्षरश: माथी मारण्यात आली. अन्यथा भाजपचा आकडा निश्चितच ४५च्या जवळ गेला असता. भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी शेवटच्या दोन दिवसांत प्रत्येक प्रभागात व घरोघरी जवळपास ५०च्या वर सभा व बैठका घेतल्या.

काँग्रेस प्रचार निष्प्रभ

’याउलट काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हा एकमेव मोठा नेता सोडला तर खासदार, आमदार, माजी आमदार येथे प्रचारासाठी आले नाही. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या खांद्यावर सर्व ६६ जागांचा भार होता. त्यातही पक्षाच्या वतीने आर्थिक मदतच काय साधे प्रचार साहित्यही दिले गेले नाही. विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, अविनाश वारजूकर चंद्रपुरात फिरकलेसुद्धा नाही. तर चंद्रपूर शहरातील वडेट्टीवार व धोटे गट घरी बसून पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी पराभव बघत बसले होते. काँग्रेसने मालमत्ता कराचा मुद्दा मांडला; परंतु ज्या प्रभावी पद्धतीने हा मुद्दा प्रचारात यायला हवा होता तसे झाले नाही. गेल्या वेळी २६ जागाजिंकलेल्या काँग्रेसच्या जागा निम्म्यांनी कमी झाल्या आहेत.

’बहुजन समाज पक्षाने इंडस्ट्रियल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन प्रभागांत आठ जागा जिंकत यश संपादन केले आहे. बसपची कामगिरी ही रिपब्लिकन पक्षासाठी अतिशय चिंतेचा विषय आहे. रिपाइंच्या खोरीप व इतर गटांनीही येथे उमेदवार उभे केले होते. मात्र रिपाइं व भारिपला यश मिळविता आले नाही. याउलट शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची पार वाताहत झाली आहे. या दोन्ही पक्षांना गटबाजी चांगलीच भोवली आहे. काँग्रेसच्या जागा १४ ने, शिवसेनेच्या जागा तीनने तर राष्ट्रवादीच्या जागा दोनने कमी झाल्या आहेत. मनसेने दोन जागा तर प्रहारचे पप्पू देशमुख यांनी स्वबळावर विजय संपादन करून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. मुस्लीम व रिपब्लिकन मतांचे या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात विभाजन झाल्याचेही दिसून आले.

untitled-18