भाजपाने राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. पुढील वर्षी देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवत गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भाजपाचं सरकार आणणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने गोव्यात जे काही काम केलं आहे त्याच्या आधारे जनता पुन्हा एकदा आम्हाला निवडून देईल हा विश्वास आहे. गोव्यात गेल्या चार निवडणुका मी सातत्याने जात असून गोव्याचा परिचय आहे. यावेळच्या गोव्याच्या निवडणुकीत मनोहर पर्रीकर आमच्यासोबत नसणार आहेत. मात्र त्यांनी पक्षाला दिशा आणि विस्तार दिला आहे त्याच्या आधारे निवडून येईल. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि राज्यातील भाजपा गोव्याच्या निवडणुकीत सक्रीय राहिली आहे. त्यामुळे राज्यातील भाजपाकडून त्यांनी शक्य ती सर्व मदत केली जाईल,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने कंबर कसली; देवेंद्र फडणवीसांकडे नवी जबाबदारी!

पुढे त्यांनी सांगितलं की, “अमित शाह, राजनाथ सिंग तसंच नितीन गडकरी या सर्वांची मदत आम्हाला मिळणार आहे. दोन राज्यमंत्रीदेखील सोबत असणार आहेत. त्यामुळे आमच्या परीने पूर्ण मेहनतीने गोव्यात पुन्हा भाजपाचं सरकार आणण्यासाठी प्रयत्न करु”.

संजय राऊतांवर टीका

“बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. मराठी माणूस पराभूत होऊच शकत नाही. बेळगावामध्ये संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव झाला आहे. भाजपाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये १५ पेक्षा जास्त मराठी लोक आहेत. त्यामुळे मराठी माणसाचा आणि एखाद्या पक्षाचा पराभव यामध्ये फरक आहे. कारण मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही,” असं सांगत फडणवीसांनी संजय राऊतांवर उत्तर दिलं आहे.

सचिन वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया

सचिन वाझे प्रकरणी एनआयएने दाखल केलेल्या चार्जशीट प्रकरणी बोलताना, “फडणवीसांनी घटनाक्रम सरकारला धक्का देणारा आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात पोलीसमधील लोक अशा प्रकारची घटना करु शकतात यापेक्षा धक्कादायक काय असू शकतं? असं म्हटलं.

उत्तर प्रदेशातील राजकारणावर भाष्य

“उत्तर प्रदेशातील राजकारणात प्रत्येक समाजाचा सन्मान आहे. पण ज्याप्रकारे भाजपाने तिथे प्रत्येक समाजासाठी काम केलं आहे, तिथे प्रत्येत समाजाला सोबत घेऊन सरकराने काम केलं आहे. सबका साथ सबका विकास हीच मोदींची घोषणा आहे. योगींचं नेतृत्व प्रवाभीपणे समोर आलं असून सर्वजण भाजपासोबत आहेत,” असा दावा फडणवीसांनी केला.

रामदास तडस प्रकरणी प्रतिक्रिया

“मी रामदास तडस यांच्याशी बोललो. यावेळी त्यांनी मुलाचं रजिस्टर मॅरेज झाल्याचं सांगितलं. मी रामदास तडस यांनी समन्वयाने काम सर्व करण्याचं आणि कायदाचा अवमान न करण्याचा सल्ला दिला आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.

चिपी विमानतळ तयार करण्यात राणेंचा मोठा सहभाग

चिपी विमानतळाच्या उद्धाटनावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले की, “सर्व गोष्टी समनव्यानेच झाल्या पाहिजेत. पण चिपी विमानतळ तयार करण्यात राणेंचा सहभाग कोणी नाकारु शकत नाही. त्यांच्या पुढाकारानेच काम सुरु झालं आणि मी मुख्यमंत्री असताना काम पूर्ण झालं. आता विमानतळ सुरु होत असताना वाद निर्माण न करता कोककणासाठी आणि पर्यटनासाठी चालना देणारं विमानतळ सुरु होणं महत्वाचं आहे. राणेंचं आणि केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांचं अभिनंदन करतो. राज्य आणि केंद्राने समन्वयानेच काम करायचं असतं. त्यामुळे श्रेयवादाची लढाई नाही. राणेंचं योगदान कोणी नाकारु शकत नाही”.