संपूर्ण राज्याचं लक्ष ग्रामपंचायत निवडणुकीच्या अंतिम निकालांकडे लागलं असताना माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच एक नंबरचा पक्ष झाला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतो यावरुन हेच दिसतं असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

“ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“लॉकडाउनच्या काळात पाठीशी उभे राहिलेले मोदी लोकांनी पाहिले, तर दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर यांना मदत न करणारं सरकार पाहिलं. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे. तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबरला येतं यावरुन हेच दिसतं,” अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

“विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगलं यश मिळालं आहे. खासकरुन सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसंच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. पण आता मोठं यश मिळालं आहे. ठाणे, रायगडमध्येही यश मिळालं आहे. स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते लढवय्ये आहेत. एकूण जे वातावरण तयार होतंय, आम्ही सातत्याने लोकांना हे सरकार कशा पद्धतीने अन्याय करतंय हे समजावून सांगतोय त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिघे एकत्रित येऊनही भाजपा पहिल्या क्रमांकाच पक्ष झाला आहे,” असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात झालेल्या पराभवावर बोलताना ते म्हणाले की, “असं होत असतं, आती मी जयंत पाटील सासूरवाडीत जिंकू शकले नाही अशी बातमी पाहिली, तिथे राष्ट्रवादी हारली. एखाद्या गावात कमी अधिक होत असतं. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांतदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांनी कौल भाजपाच्या बाजूने दिला. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत चांगलं यश मिळालं आहे. एखाद्या गावात काय झालं हे महत्वाचं नाही पण एकूण कौल भाजपाला मिळाला आहे”.

“शिवसेना पॅन महाराष्ट्र पक्षच नाही. ग्रामपंचायतीत आम्हाला तिन्ही पक्षांसोबत लढावं लागलं. या तिन्ही पक्षांच्या आपल्या जागा असून तिथे ते मजबूत आहेत. भाजपाचं मात्र तसं नाही, भाजपा आज पूर्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळेच आमच्यासाठी जागा मोठी असून ती आम्ही व्यापत आहोत,” असंही ते म्हणाले. “उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेलं असतं. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही. ट्राफिक सुरुच राहतो सरकारकडे …त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटत आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला.