राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कान टोचले आहेत. आपण गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली. पवार हे आमचे राजकीय विरोधक आहेत, पण शत्रू नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल असे शब्द वापरणं चुकीचं आहे. कोणत्याही कठोर भावना मांडण्यासाठी योग्य ते शब्द वापरले गेले पाहिजेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

आणखी वाचा- “शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला करोना”, गोपीचंद पडळकर यांचं वादग्रस्त वक्तव्य

गोपीचंद पडळकर काय बोलले आहेत? 
गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे”.

आणखी वाचा- गोपीचंद पडळकर यांचं तोंड काळं करुन चोप देणार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

“शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटींचं पॅकेज घोषित केलं होतं. पण सरकार गेल्यानं त्यांना कारवाई करता आली नाही. मात्र या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसंच घरांसंबंधी निर्णय़ आहेत. विधान परिषदेचं अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु,” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल”, जितेंद्र आव्हाड यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा

जितेंद्र आव्हाडांचा इशारा 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे. शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे अशी टीका त्यांनी केली आहे.