राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा आदेश दिला असून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. देवेंद्र फडवणीस सध्या काही पूरग्रस्त ठिकाणांचा दौरा करत असून यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. करोना संकट संपल्यानंतर जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच भरवणार असल्याचं ते म्हणाले आहेत. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“जी काही चौकशी करायची असेल ती त्यांनी जरुर करावी. ही मंत्रालयात सह्या करुन टेंडर दिलेली कामं नाहीत. सहा लाख कामं झाली आहेत. सहा लाख कामं विकेंद्रीत पद्धतीनं झाली आहेत. जिल्हाधिकारी यांचे प्रमुख होते. त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद, कृषी विभाग, जलसंधारण, वन विभागानं कामं केली आहेत. एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंतची ही कामं आहेत. स्थानिक पातळीवर टेंडर काढून ही कामं झाली आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आणखी वाचा- कर्ज काढतोय म्हणजे पाप करत नाही, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर निशाणा

“७०० तक्रारी प्राप्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, सहा लाख कामांमध्ये ७०० तक्रारी अर्धा टक्कादेखील नाहीत. सरकारी कामात एक टक्क्काही तक्रार येऊ नये, पण त्यात किमान पाच ते सात टक्के किमान असतात. जाणीवपूर्वक चौकशी लावण्यात आली आहे. अशा चौकशा लावून विरोधी पक्षनेत्याचं तोंड बंद करता येईल असं वाटत असेल तर तसं होणार नाही. विरोधी पक्षनेता जनतेचा आहे, तो जनतेकरताच काम करणार आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “”करोना संकट संपू द्या आम्ही प्रत्येत गावात, तालुक्यात जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मतच नोंदवणार आहे. आमच्याकडे आधीपासून ते आहेदेखील. अनेक शेतकऱ्यांनी काय फायदा झाला हे सांगितलं आहे. जलयुक्त शिवारमुळे किती फायदा झाला याचं प्रदर्शनच मांडणार आहोत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे”.