माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गतवर्षी पहाटे शपथविधी घेत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणलेल्या त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधीवर भाष्य केलं असून आता पहाटे शपविधी घेण्याची गरज पडणार नाही असं म्हटलं आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारासंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

“जे झालं ते झालं. पण आता तुम्हाला ज्यावेळी शपथविधी पाहण्यास मिळेल तेव्हा पहाटेची वेळ नसणार आहे. योग्य वेळी शपथविधी पाहण्यास मिळणार आहे. त्या अडीच दिवसांच्या सोहळ्यावर पुस्तक लिहण्याचं काम सुरू आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. “असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात,” असंही यावेळी ते म्हणाले.

आणखी वाचा- फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधी वर्षपूर्तीवर संजय राऊतांचा टोला; म्हणाले…

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर केलेल्या वक्तव्यारही भाष्य केलं. “चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या विधानाचा विपर्यास केला गेले, असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपला आहे,” असं फडणवीस यांनी म्हटल आहे.

आणखी वाचा- शरद पवारांना छोटे नेते म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांनी फटकारलं; म्हणाले…

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला सल्ला देताना म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा ज्येष्ठ नेते असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांच्याबद्दल बोलताना काही वाटत नाही. दुसऱ्या नेत्याकडे आपण जर बोट करत असाल तर चार बोटं आपल्याकडे हे लक्षात ठेवा”.

आणखी वाचा- कराची एक दिवस भारतात असेल- देवेंद्र फडणवीस

दरम्यान संजय राऊत यांनी शपथविधीच्या वर्षपूर्तीवर बोलताना टोला लगावला आहे. “ती पहाट नव्हती तो अंधकार होता. आम्हाला कोणताही धक्का बसला नव्हता. आमच्या सर्व स्मृती सुखदायक आहेत. त्या पहाटेच्या सुद्धा…पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. पहाटे पहाटे मला जाग आली…अजून ते झोपलेले नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. “पुन्हा ती पहाट येणार नाही, कधीच येणार नाही,” असाही विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.