राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजपा नेते करत आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं असून पोलिसांनी सत्य समोर आणलं पाहिजे असं म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी सोडलं मौन; म्हणाले…

“धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं धनंजय मुंडे याचं आहे. आपण कोर्टात गेल्याचं धनंजय मुंडे सांगत आहेत. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. तात्काळ पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“…पण गेंड्याच्या कातडीचे सरकार मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटत नाही”

मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपानं आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणालेत –
“सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटलांनी काय भूमिका मांडली-
“राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणं योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.