काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
आणखी वाचा – ‘पाच वर्षांपूर्वीच शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव’
देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी बोलताना सांगितलं की, “अत्यंत आश्चर्यकारक आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने हे वक्तव्य केल्याने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. यामधून शिवसेनेचा खरा चेहरा उघड होतो आहे. विचारधारा, तत्वं, मूल्य अशा काहीच गोष्टी नाहीत का ? सत्ता हेच त्यांच्यासाठी सगळं आहे का ? एकदा शिवसेनेने खुलासा केला पाहिजे”.
जे पी नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “अमित शाह यांच्या नेतृत्त्वात भाजपाने खूप मोठा विस्तार केला. अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली. केंद्रात दोन वेळा मोदी सरकार आलं. जे पी नड्डा यांची सामान्यांशी नाळ जुळलेली आहे. कार्यकर्त्यापासून त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास आहे. त्यांच्या नेतृत्तावाही भाजपा वेगाने पुढे जाईल”.
सरकारमुळेच शिर्डी-पाथरी वाद ?
साईबाबा हे सगळ्याचं श्रद्धास्थान आहे. त्यांच्याभोवती असा वाद होणं दुर्दैवी आहे. सरकारमुळेच हा वाद निर्माण झाला आहे. सरकारने पुढाकार घेऊन वादावर तोडगा आणला पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 12:55 pm