मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन भाजपाने राजकारण केलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की करोना काळात आम्ही राजकारण केलं नाही पण मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राजकारण केलं. घाईनं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला असता तर निर्णय घेण्यासाठी एवढी घाई का केली असती असाही प्रश्न विरोधकांनीच आम्हाला विचारला असता. त्यामुळे दोन्हीकडून बोलायचं अशी भूमिका विरोधी पक्ष घेत आहे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसंच महाविकास आघाडी सरकारने करोना काळात चांगलं काम केलं नाही हा आरोप चुकीचा आहे. सरकारने आणि जनतेने मिळून चांगलं काम केलं आहे असं अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं.

आणखी वाचा- “मला पाडून दाखवा,” अजित पवारांनी मुनगंटीवारांना दिलं जाहीर आव्हान

मोदी सरकारने अद्याप सुमारे ३० हजार कोटींचा निधी पाठवलेला नाही. मात्र निधी नाही म्हणून कामं थांबलेली नाहीत, थांबणार नाहीत. गेल्या पाच वर्षात कुठे किती निधी दिला गेला हे आता मला सांगायला लावू नका असं म्हणत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे. निसर्ग वादळाचं, अतिवृष्टीचं संकट आपल्या राज्यावर आलं त्यानंतर इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची टीम पत्रव्यवहार करुनही आली नाही अशीही टीका अजित पवार यांनी केली आहे. आम्ही निधी खर्च करताना आणि जनतेसाठी काम करताना दुजाभाव केला नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “उद्धव ठाकरेंचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे,” देवेंद्र फडणवीसांनी खडसावलं

पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला ती सल भाजपा नेत्यांच्या मनात आहे. आमच्या पाच जागा निवडून येतील असं भाजपाने सांगितलं होतं. मात्र जो पराभव झाला तो पराभव या सगळ्यांच्या जिव्हारी लागला आहे.  करोना काळ असेल किंवा शेतकऱ्यांवर आलेलं संकट असेल महाविकास आघाडी सरकारने चांगले निर्णय घेतले आणि चांगलं काम केलं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला”; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मंत्र्यांच्या बंगल्यावर १७ कोटींचा खर्च वर्षभरात झाला आहे. ९० कोटी रुपये मंत्र्यांचे बंगल्यांवर आणि शासकीय इमारतींवर झाल्याच्या बातम्या निरर्थक आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. वर्षा आणि तोरणा बंगल्यांची पाणी पट्टी तर मुळीच बाकी नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.