शिवसेना नेते संजय राऊत बिनबुडाचा लोटा आहेत अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. संजय राऊत शिवसेनेचं खातात, मात्र पवारांसाठी जागतात. त्यामुळे अशा संजय राऊतांची धनगर समाजाला आवश्यकता नाही असंही ते म्हणाले आहेत.

“मुळात जे आदिवासींना तेच धनगरांना. जोपर्यत प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांसाठीच्या योजनेतील १००० कोटी दिले होते. हे पैसे संजय राऊत यांच्या मालकाने अडवून ठेवले असून देत नाही. याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे,” असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.

“ओबीसी समाजासाठी फडणवीस यांनी २३ जीआर काढले तेसुद्धा संजय राऊत यांना माहिती नाहीत. एकाही आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्या बाबत आपलं आधी तोंड उघडा. त्यामुळे मी त्यांचा निषेध करतो,” असं ते म्हणाले आहेत.

“दोन भावामध्ये भांडण लावण्याचं काम या संजय राऊतांनी केले आणि राजीनामा घेतला. काकांच्या सांगण्यावरून अग्रलेखात अविनाश भोसले हे अजित पवारांच्या किती जवळचे आहेत हे सांगत असून पुतण्याच्या मागे फटाके लावायचे काम करत आहेत,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.