भाजपाला आगामी निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागला आहे त्यामुळेच लोकसभेसह ११ राज्यांच्या निवडणुका घेण्याचे खूळ सरकारच्या डोक्यात आल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपा आता निवडून येणार नाही याची पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती वाटते आहे त्याचमुळे एकत्र निवडणुकांचा घाट घातला जातो आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषेदत त्यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. याच पत्रकार परिषदेत पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाचाही उल्लेख त्यांनी केला. मी जे बोललो ते १९६० पासून सुरू आहे. अजित पवारांनी ते मनाला लावून का घेतलं? माहित नाही मात्र अजित पवारांनी ती गोष्ट मनाला लावून घेऊ नये असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज्यात १ लाख २० हजार विहिरी लोक सहभागातून बांधण्यात आल्याची माहिती समोर आली, असे असेल तर सरकारी अधिकारी काय करत आहेत? ते आमिर खानसाठी काम करत आहेत का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला. सध्या देशात ‘वन नेशन वन इलेक्शन’ची चर्चा चांगलीच रंगली आहे. एककीडे मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रक्रियेसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागेल असे म्हटले आहे. अशात याच मुद्द्यावरून मोदींना पराभव स्पष्ट दिसू लागल्यानेच वन नेशन वन इलेक्शनचा घाट घातला जातोय अशी टीका राज ठाकरेंनी केली.