भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे मात्र त्यात तथ्य नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसं झालं तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला.

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदच आभासी होती- अनिल परब

करोनाच्या काळात ठाकरे सरकार खूप चांगलं काम करतं आहे. सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक चाचण्या या महाराष्ट्रात होत आहेत. मुंबईत करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयंही उभी करण्यात आली आहेत. गुजरातची अवस्था किती बिकट आहे ते जरा बघा. मला स्पर्धा करण्याची गरज वाटत नाही मात्र महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधली स्थिती अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्राचं अनुकरण हे देशातील इतर राज्यंही करू लागली आहेत. अशा काळात फडणवीस यांनी राजकारण करु नये. उलट या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी अजूनही वेळ गेलेली नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

मजुरांना घरी जाण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून पैसे देण्यात आले. आम्ही ज्या ज्या सुविधा मागितल्या त्या आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाहीत अशी खंतही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.