करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या व्यावसायिक आणि कला, विज्ञान, वाणिज्य आदी पारंपरिक अभ्यासक्र मांच्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती सध्या तरी राज्यात नाही. त्यामुळे या परीक्षा न घेण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो निर्णय जाहीर केला. परंतु एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे. “चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा चमत्कारीक कारभार सुरू आहे,” असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

“परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय काढून आज १५ दिवस झाले. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांनी ना त्यावर बैठक घेतली? ना विद्यापीठात कसलेच “योग्य सूत्र” ठरले? चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा सगळा हा चमत्कारिक कारभार! वाचव रे बा, विठ्ठला!!,” असं म्हणत शेलार यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर टीका केली.

यापूर्वीही एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या निर्णयावरून आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. “आदी(त्य) घोषणा आणि मग होमवर्क. म्हणून आता लपून-छपून बैठका घ्याव्या लागतात. वारंवार ‘परीक्षा रद्द’ एवढेच जाहीर होते. पण ATKT असलेल्यांबद्दल निर्णयाचे काय? निर्णय कधी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कुठलीच सूत्र माहिती देत नाहीत. दिवसागणिक विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढतेय,” असंही ते म्हणाले होते.