“उद्योगपती, व्यावसायिक, व्यापारी यांनी गुंतवणूक करावी, असा माहोल आता निर्माण व्हायला हवा. उद्योगपती पळून जाणे हे आता नव्या आत्मनिर्भरतेकडे जाणार्‍या भारताला परवडणारे नाही. उद्योजक, व्यापारी यांना टिकवून ठेवावे लागेल. त्यासाठी दहशत निर्माण करणार्‍या ईडी, सीबीआयसारख्या ‘राजकीय’ संस्थांचे काही काळ ‘लॉकडाउन’ करावे लागेल. लॉकडाउन – ४ चे सुतोवाच करताना पंतप्रधानांनी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही? याचा विचार केला तर एकच कारण दिसते ते म्हणजे भांडवलदार, गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. त्यांना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी विश्वास आणि अभय दिलेच पाहिजे!,” असा सल्ला शिवसेनेनं दिला होता. त्यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला हाणला आहे.

शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून उद्योगपती पळून जाणे हे आता नव्या आत्मनिर्भरतेकडे जाणार्‍या भारताला परवडणारे नाही. उद्योजक, व्यापारी यांना टिकवून ठेवावे लागेल. त्यासाठी दहशत निर्माण करणार्‍या ईडी, सीबीआयसारख्या ‘राजकीय’ संस्थांचे काही काळ ‘लॉकडाउन’ करावे लागेल, असं म्हटलं होतं. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी “अंग्रेजों के जमाने के जेलर और इतनी घबराहट ????” असं म्हणत त्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून हल्लाबोल केला. त्यांनी यासोबत शोले या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत अभिनेते आसरानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेद्र हे दिसत आहेत. याच चित्रपटातला “अंग्रेजों के जमाने के जेलर है” हा डायलॉग फार गाजला होता.

आणखी वाचा- “आत्मनिर्भर भारताला उद्योगपती पळून जाणे आता परवडणार नाही; ईडी, सीबीआयसारख्या संस्थांना लॉकडाउन करावं लागेल”

काय म्हटलंय अग्रलेखात ?

“पंतप्रधानांनी ‘लॉकडाउन-४ नव्या स्वरुपात पेश करण्याबाबत घोषणा केली. त्याचबरोबर कोसळलेली अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज भारताला स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी आहे असे पंतप्रधान सांगत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेवर पंतप्रधानांनी भर दिला आहे. त्याबाबत ते टप्प्याटप्प्याने घोषणा करतील. सध्या उद्योग, व्यवसाय, व्यापार ठप्प आहे. बड्या भांडवलदारांनाही घाम फुटला आहे. छोटे, मध्यम आकाराचे उद्योग तर मरून पडले आहेत. पंतप्रधानांचे २० लाख ‘कोटीं’चे पॅकेज याच लघू, मध्यम आणि छोटे उद्योजक तसेच व्यावसायिकांना आधार देण्यासाठी आहे. गरीब, मजूर, शेतकरी, नियमित कर देणार्‍या मध्यमवर्गीयांनाही या पॅकेजचा लाभ मिळेल, असे भासवण्यात आले आहे. एकंदरीत २० लाख कोटी हे देशातील १३० कोटी लोकसंख्येत वाटले जातील व त्यातील गरीब, मध्यमवर्गीयांना या पॅकेजचा लाभ मिळेल, असे पसरवले गेले आहे. या २० लाख कोटीतून भारत स्वावलंबी बनेल. म्हणजे तो आता स्वावलंबी नाही काय?,” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.