विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची ताकद दिसून आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुका लढवल्यास भारतीय जनता पक्षाला पन्नासपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात केले. त्यांच्या या विधानाच्या बातमीचं कात्रण पोस्ट करत ट्विटद्वारे भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांचा समाचार घेतला.

तीन पक्ष एकत्र येऊन लढल्यास भाजपाचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत असं म्हणणारे जयंत पाटील यांनी लक्षात ठेवायला हवं की दगाबाजांबरोबर आघाडी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी अशा वल्गना करायच्या नसतात, असा टोला भातखळकर यांनी लगावला. तसेच, ‘जयंतराव (पाटील), भाजपाच्या पराभवाबाबत इतके आश्वस्त राहू नका. इतकंच असेल तर उद्या विधानसभा बरखास्त करा आणि राज्यात निवडणुका घ्या. मग दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ देत…’, असे आव्हानही त्यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना दिले.

आणखी वाचा- ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेचा मोठा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जयंत पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली. भाजपाला हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेल्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. आता भाजपाने मिशन मुंबईचा नारा दिला आहे. यावर काय सांगाल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्याबाबत, “नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद आपल्या सर्वांना दिसून आली. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत लढली, तर भाजपचे ५० आमदारसुद्धा निवडून येणार नाहीत. राजस्थान आणि हैदराबाद येथे काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का? याबाबत विचारमंथन करण्याची गरज आहे”, असं ते म्हणाले होते.