अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना करण्यात आलेल्या अटकेवरून सध्या राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुबांतील व्यवहारावरून गौप्यस्फोट केला होता. या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर यांचंही नाव सोमय्या यांनी घेतलं होतं. यावरून सध्या आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीदेखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“भावांनो समजुन घ्या. मुख्यमंत्री जमीन खरेदीत खूपच व्यस्त असल्यामुळे राज्यातल्या समस्या हाताळण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नसावा. फक्त अन्वय नाईक कुटुंबीयांसोबत २१ व्यवहार झालेत. खरंच ते जमिनीशी जोडलेले मुख्यमंत्री आहेत,” असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

आणखी वाचा- संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना दिली जाहीर ‘वॉर्निंग’; म्हणाले…

काय म्हणाले होते सोमय्या ?

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असा गंभीर आरोप सोमय्या यांनी ठाकरे कुटुबांवर केला होता.

आणखी वाचा- ठाकरे कुटुंबासोबत केलेल्या जमीन व्यवहारावर अन्वय नाईक कुटुंबीयांनी केला खुलासा; म्हणाले…

किरीट सोमय्या यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्वीट केली होती. “ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असं सोमय्या यांनी म्हटलं होतं.