महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. महाराष्ट्रातील सरकार स्थापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. या मुलाखतीचा मूळ हेतू राज्यातील विरोधकांना धमकावण्याचाच आहे, असा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. एकीकडे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सत्ताधाऱ्यांकडून आपल्या कामांची यादी सादर केली जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून सरकारवर टीकाही सुरू आहे. “थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…,” असं म्हणत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला.

“विचार वर्षभरातलं माझं एकतरी ठोस काम जनतेच भलं करणारं, मेंदूला ताण देत घे वर्षभराचा धोंडोळा, फुफ्फुसात पुरेशी हवा भर, मोठासा उसासा घे, स्मरल्या जर तोंडाच्या वाफा, पकाऊ FB लाईव्ह, बाष्कळ कोट्या, फालतू विनोद, सूडाचे कंड, थुकरट मुलाखती, स्थगित्या नी यू-टर्न, बघ माझी आठवण येते का…,” अशी कविता करत भातखळकर यांनी सरकारला टोला लगालवला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं.

यापूर्वी फडणवीसांचीही टीका

“महाविकास आघाडीचं सरकार हे सगळ्या बाबतीत अपयशी ठरलेलं आहे. राज्याच्या इतिहासात धमकावणारे मुख्यमंत्री कधीही पाहिलेले नाहीत. याच्यामागे हात धुवून लागू, त्याची खिचडी करू, याचा खिमा करू अशी भांडणं नाक्यावर होतात. असं बोलणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. कारण चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्रात फार काळ टिकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी शब्द संयमाने आणि जपून वापरावे”, असा इशारा फडणवीसांनी दिला.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री या पदाचा मान राखायला हवा. त्यांना माझा सल्ला आहे की मुख्यमंत्र्यांसारखे वागा. पदाला साजेसा संयम ठेवा आणि तो तुमच्या कृतीतून दिसू द्या. मुख्यमंत्र्यांची मुलाखतीत विकासावर चर्चा झालीच नाही. संपूर्ण मुलाखत टीका टिपण्णीमध्ये गेली. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला शोभणारी ती वक्तव्यं नव्हती. माझं असं प्रामाणिक मत आहे की उद्धव ठाकरे यांनी पाच वर्ष नक्की राज्य चालवावे पण नुसत्या धमक्या नकोत. त्यापेक्षा कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणा”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.