उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत आज केलेल्या विधानावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

“२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे. औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा. पक्ष असाच चालवतात आणि राज्य सरकारही. मधल्यामध्ये सत्यानाश मात्र जनतेचा होतो आहे.” असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत.

४०३ की १००? शिवसेना उत्तर प्रदेशात नेमक्या किती जागा लढवणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने संभ्रम

शिवसेनेने पुढील वर्षीच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. मात्र, आता शिवसेना किती जागा लढवणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या उत्तर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पक्ष फक्त १०० जागांवरच लढणार आहे असे म्हटलेलं आहे.