आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहोचणार आहे याची सामान्य माणसाला खात्री आहे. म्हणूनच सामान्य माणसांकडून राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात आहे. त्यामुळे मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला एका पत्रकाद्वारे लगावला. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राममंदिर निधी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर शंका घेतली. तसेच, हा निधी योग्य ठिकाणीच जाईल याची राज्य सरकारने काळजी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर भाजपाकडून उत्तर देण्यात आलं.

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- काँग्रेस

“राममंदिरासाठी सामान्य माणूस स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही याची चिंता काँग्रेसवाल्यांना वाटू लागली आहे. राममंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे. निधी संकलन करणारे कार्यकर्ते त्याची पावती त्वरित निधी देणाऱ्याकडे सुपूर्द करत आहेत. निधी संकलन करणाऱ्या संघटनांवर विश्वास असल्यानेच गोरगरिबही निधी संकलनास हातभार लावत आहेत. ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहे, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राममंदिराचा निधी नॅशनल हेराल्डप्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे”, असा टोला केशव उपाध्ये पत्रकातून लगावला.

काय म्हणाले सचिन सावंत?

“अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. पण या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएसदेखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता आहे. हा पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठी आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल याची खबरदारी घ्यावी. तसेच आजवर भाजपा-आरएसएसमार्फत गोळा केलेला निधी सदर ट्रस्टलाच भाजपा-आरएसएसने पोहोचवला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. “भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे”, असा इशाराही त्यांनी भाविकांनी दिला.