दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे कुठलाही ताळमेळ नसलेली निर्बुद्ध, शिवराळ बडबड होती. असं भाषण यापूर्वीच्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं अशा शब्दात भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.

मुख्यमंत्री म्हणून एकवर्ष व्हायला आलं. त्यांनी राज्यामध्ये केलेल्या विकास कामाचा उल्लेख केला नाही. शेतकरी, शिक्षणाचे प्रश्न, राज्याची अर्थव्यवस्था याबद्दल काहीही बोललेले नाहीत अशी टीका नारायण राणे यांनी केली.

आणखी वाचा- “बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं”

कालच्या भाषणात करोनाचा उल्लेख केला नाही. करोनामुळे देशामध्ये सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले. राज्यात जवळपास ४२ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. याची नैतिक जबाबार मुख्यमंत्र्यांवर येत नाही? त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी का केला नाही, असा सवाल राणेंनी विचारला.

आणखी वाचा- …नाहीतर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढेन, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

राज्य आज दिवाळखोरीच्या उंबरठयावर आहे. जनाची नाही, तर मनाची वाटली पाहिजे. कोणाबद्दल काय बोलावं हे कळत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाला लायक नाही. पंतप्रधानांबद्दल त्यांच्या कामाबद्दल बोलण्याची मुख्यमंत्र्यांची योग्यता नाही असे नारायण राणे म्हणाले.

आमच्याकडे नजर फिरवू नका, पळताभुई थोडी होईल. बेडूक एका दिशेने जातो, गांडुळ दोन्ही बाजूंनी फिरतो. मातोश्रीचा इतिहास बाहेर काढेन असा इशारा नारायण राणे यांनी दिला.