नाचता येईना अंगण वाकडे अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे अशी टीका करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आज सामनामध्ये दिलेल्या मुलाखतीवर नारायण राणेंनी कडाडून टीका केली आहे. या सरकारने ६५ हजार कोटींचं कर्ज मागील सहा महिन्यात काढून ठेवलं आणि राज्य दिवाळखोरीत नेलं असाही आरोप नारायण राणे यांनी केला. हात धुवून मागे लागेन अशी धमकी त्यांनी दिली आहे ती नेमकी कशाच्या जीवावर दिली आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उद्ध्वस्त करणाऱ्या मार्गावर जाऊ नये विकासाच्या मार्गावर जावं असाही सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “कुटुंबावर किंवा मुला-बाळांवर येणार असाल तर…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

हे सरकार तीन पक्षांचं सरकार आहे. जनतेशी गद्दारी करुन आलेलं हे सरकार आहे हे सरकार फार काळ टीकणार नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही नारायण राणेंनी भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने नव्हते, त्यांना कधीही मराठा समाजाला आरक्षणाला समर्थन दिलेलं नाही. सुप्रीम कोर्टात चांगले वकील नेमण्याची गरज आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मातोश्रीच्या पिंजऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडकले आहेत. ते कार चालवतात याचं संजय राऊत कौतुक करत आहेत. मात्र महाराष्ट्राला ड्रायव्हर नको आहे सक्षम मुख्यमंत्री हवा आहे अशीही टीका नारायण राणे यांनी केली आहे. महाराष्ट्रात हे जे तीन पक्षांचं सरकार आहे ते सरकार महाराष्ट्र हिताचं नाही त्यामुळे हे सरकार जाण्यासाठी जर कुणी प्रयत्न केले तर ते मी गैर मानणार नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.