१० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील गोरगरीब जनतेसाठी १० रुपयांत शिवभोजन उपलब्ध करुन देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या संदर्भातले ट्विट करुन ही माहिती दिली आहे. राज्यसरकारच्या या निर्णयानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्यासमोर जेवण वाढलेलं दिसत आहे. तो फोटो ट्विट करून ही थाळी किती रूपयांची आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. या फोटोमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे दिसत आहेत.

१० रुपयांमध्ये मिळणाऱ्या थाळीत दोन पोळ्या, भाजी, वरण आणि भात यांचा समावेश असणार आहे. या थाळीला शिवभोजन असे नाव देण्यात आले आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ५० ठिकाणी हे शिवभोजन मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात १० रुपयांच्या थाळीची घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेतही १० रूपयांमध्ये थाळी सुरू करण्यात आली होती. परंतु ती केवळ पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठीच होती. त्यानंतर ही थाळी सर्वसामान्यांना कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता शिवभोजन योजनेला म्हणजेच १० रुपयांत थाळी मिळण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच ही थाळी सामान्यांसाठीही उपलब्ध होणार आहे.