करोनामुळे गेल्या सहा- सात महिन्यांपासून संपूर्ण देशातील उद्योग- व्यवहार ठप्प झालेले असताना जगभरातील गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रालाच प्राधान्य दिलं आहे. देशविदेशातील १५ मोठ्या उद्योगसमूहांनी राज्यात सुमारे ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या. नव्या करारांमुळे राज्यात २३ हजार रोजगार निर्माण होतील. सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळे येत्या दोन महिन्यांत आणखी काही मोठ्या गुंतवणुकीचे करार होणार असून, राज्यात एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. "स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल," असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. राज्यात गुंतवणूक टाळेबंदीमुळे ठप्प झालेले उद्योगचक्र पुन्हा सुरू करण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या पर्वाचा प्रारंभ जून महिन्यात करण्यात आला होता. त्यानुसार राज्याने उद्योग धोरणात केलेल्या आमूलाग्र बदलाचा दृश्य परिणाम दिसू लागला आहे. पहिल्या टप्यात जूनमध्ये अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणूकदारांशी १७ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले होते. हे प्रकल्प मार्गस्थ झाल्यानंतर सरकारने आता पुन्हा जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आघाडी घेतली आहे. आणखी वाचा- केंद्राने दिलेल्या २२०० कोटींच्या निधीपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक ३९६ कोटींचा निधी- फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत देश-विदेशातील १५ कंपन्यांमार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासमवेत (एमआयडीसी) ३४ हजार ८५० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामध्ये जपानमधील मित्सुबिशी इलेक्ट्रिक कंपनी ४९० कोटींची तर स्पेनची मंत्रा डेटा सेंटर्स ११२९ कोटींची गुंतवणूक करणार असून, इंग्लंडची कोल्ट कंपनी चार हजार ४०० कोटींची गुंतवणूक करून भव्य डेटा सेंटर्स उभारणार आहे. सिंगापूरचा प्रिस्टन डिजिटल उद्योगसमूह १५०० कोटींची तर इएसआर इंडिया कंपनी चार हजार ३१० कोटींची गुंतवणूक लॉजिस्टीक क्षेत्रात करणार आहे. याशिवाय देशातील काही महत्वाच्या कं पन्या डेटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करीत आहेत. यातील बहुतांश उद्योग चाकण -पुणे, रायगड तसेच नवी मुंबई आणि मुंबईत उभे राहणार आहेत.