“राज्यातील सत्ता टिकविणे हे तुमच्यासाठी संकट झाले आहे. महाविकास आघाडीचे सरकार एकत्र काम करत आहे, मग पृथ्वीराज चव्हाण यांना हे सरकार आपले का वाटत नाही का?,” असा सवाल भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना केला. महाविकास आघाडीच्या एकत्रित पत्रकार परिषदेवरही त्यांनी टीका केली. “विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे वस्तुस्थितीपर मुद्दे मांडले ते खोडून काढण्यासाठी राज्यातील तीन मंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. पण ही पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार ठरला आणि महाविकास आघाडीची पत्रकार परिषद बिघाडी झाली,” असंही ते म्हणाले.

आम्ही निर्णय घेणारे नाही असे राहुल गांधी का म्हणत आहेत? असा सवाल दरेकर यांनी केला. तुम्ही जर एकत्रित आहात तर विजय वडेट्टीवार यांनी १० हजार एसटी मोफत सोडण्याची घोषणा केली होती त्याचे काय झाले? उद्योग विषयक केंद्राच्या योजनांचा फायदा घेऊन धोरणे आखायला हवीत आणि महाराष्ट्राचे स्थान अबाधित ठेवायला हवे. पण उद्योगधंदे सुरळीत करण्याचे नियोजन या सरकारमध्ये नाही. ५० हजार उद्योग सुरु करण्याची घोषणा केली पण प्रत्यक्षात उद्योग सुरु झाले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चांगलं काम केल्यास नाव होईल

रुग्णांना रुग्णालयात बेड का मिळत नाहीत? व्होटिंलेटर्स कुठे आहेत? सध्या हे सांगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ काळजी करण्यापेक्षा उपायायोजना करण्याची आवश्यकता आहे. ती उपाययोजना दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने चांगले काम करावे मग नक्कीच नाव होईल. पण इतके मृत्यू होऊन सरकारची बदनामी नाही तर काय होणार. आमच्याकडे दुर्लक्ष केले तरी चालेल. पण रुग्णांकडे लक्ष द्या, त्यांना सोयी सुविधा द्या, असंही त्यांनी नमूद केलं.

हे तुमच्या मनाचे खेळ

सरकार अस्थिर करण्याचे तुमच्याच मनाचे खेळ आहेत, अशा परिस्थितीत कोणीही सरकार अस्थिर करत नाही. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. पण केवळ तुमचे अपयश झाकण्यासाठी अस्थिर-अस्थिर अशी ओरड केली जात आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.