“भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून असे पॅकेज जाहीर करायला लावावं. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते दाखवणार नाहीत. कारण आपल्याला मुख्यमंत्री विचारणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच ते भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा केविलवाणा स्टंट करीत आहेत,” असं म्हणत भाजपा नेते आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

“केंद्र सरकारने महाराष्ट्राला विविध माध्यमातून २८ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची थेट मदत दिली आहे . याउलट महाविकास आघाडी सरकारने राज्यात एका कवडीचेही पॅकेज गोरगरिबांना दिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा खरंच कळवळा असेल तर काँग्रेस नेत्यांनी भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याऐवजी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून गरिबांसाठी पॅकेज जाहीर करायला भाग पाडावे. पण तेवढे धाडस काँग्रेस नेते दाखविणार नाहीत. कारण आपल्याला मुख्यमंत्री विचारणार नाहीत, आघाडी सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही, हे काँग्रेस नेत्यांना ठाऊक आहे. म्हणूनच ते भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा केविलवाणा स्टंट करीत आहेत,” असे उपाध्ये म्हणाले.

आणखी वाचा- लहान वयाच्या पार्थ पवारांचा कोणी वापर तर करून घेत नाही ना? – शिवसेना

२८ हजार कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य

किसान सन्मान निधी, जनधन, उज्ज्वला, शेतमाल खरेदी या सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला २८ हजार कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य मिळाले आहे. जीएसटीपोटी १९ हजार कोटी रुपये केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत. राज्यांच्या कर्ज उभारणीच्या मर्यादेत वाढ केल्याने महाराष्ट्राला १ लाख २५ हजार कोटी रुपये कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध होतील. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यात कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करण्यात आलेला नाही. आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप केले जात असल्याचेही ते म्हणाले.

“केंद्राने लॉकडाउनच्या काळात राज्यातील शेतमालाची केलेली खरेदी व पीक विम्याची रक्कम विचारात घेतली तर महाराष्ट्राला ९ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कापूस, तूर, तांदूळ, मका यांसारख्या पिकांच्या खरेदीसाठी केंद्र सरकारने ८ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. पीपीई किट, मास्क, गोळ्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला आहे. मुद्रा योजनेतून कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांचे दोन महिन्यांचे व्याज केंद्र भरले आहे. यातून महाराष्ट्रातील हजारो छोट्या उद्योजकांचा १०० कोटींचा लाभ होणार आहे,” असंही उपाध्ये यांनी स्पष्ट केलं.