राज्‍यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढव आहे. या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्‍या ग्राम पंचायतींच्‍या निवडणुकीचा पुढील कार्यक्रम जाहीर होईपर्यंत निर्वाचित सरपंच आमि ग्राम पंचायत सदस्‍यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

या मागणी संदर्भात मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्‍य सचिव आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना मुनगंटीवार यांनी ईमेलद्वारे पत्रे पाठविली आहेत. ग्राम पंचायत ही लोकशाहीच्‍या श्रृंखलेतील महत्‍वपूर्ण स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आहे. कोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य शासनाने काही निवडणुकीच्‍या प्रक्रिया पुढे ढकलल्‍या आहेत, असं त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

आणखी वाचा- समन्वय, संतुलन व संवेदना ही आचारसंहिता स्वीकारा : खासदार सहस्त्रबुद्धे

तसंच सहकारी संस्‍था व बँका यामध्‍ये प्रशासक न नेमता कार्यकारीणीला मुदवाढ देण्‍यात आली आहे. राज्‍यात अनेक ग्राम पंचायतींची मुदत संपलेली आहे. अशा परिस्‍थीतीत जो न्‍याय सहकारी संस्‍थांना लागू करण्यात आला आहे तोच न्‍याय ग्राम पंचायतींना सुद्धा लागू करण्‍याची आवश्‍यकता आहे. सदर ग्राम पंचायतींवर प्रशासक न नेमता जनतेद्वारे निर्वाचित ग्राम पंचायत सरपंच व सदस्‍यांना पुढील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत मुदतवाढ देण्‍यात यावी, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाला केली आहे.