भाजप आमदार आशीष देशमुख यांची टीका नागपूर : स्वपक्षीय सरकार तसेच मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका करणारे भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी आज पुन्हा कोरडय़ा दुष्काळाच्या मुद्यावरून पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. पावसाने उसंत घेतल्याने पीक धोक्यात आले असताना पालकमंत्र्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही आणि मुख्यमंत्र्यांनाही या प्रश्नाची दखल घेण्यास वेळ नाही, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली. काटोल क्षेत्रातील जाम धरणात केवळ १७ टक्केच पाणी आहे. त्यामुळे सिंचनावर प्रश्नचिन्ह लागले आहे. पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष जाणवणार आहे. नागपूर क्षेत्रातील पेंच, तोतलाडोह या धरणात देखील पाणीसाठी अत्यल्प आहे. कारण चौराई धरणात पाणी अडवले जात आहे. त्यामुळे नागपूरची परिस्थितीही फार वेगळी राहणार नाही. खरीप पिके थोडेफार वाचतील, पण इतर पिकांची स्थिती चांगली नाही. यंदा अत्यल्प पाऊस झाला. त्यानंतर त्याने दीर्घ उसंत घेतली. त्यामुळे पिके करपू लागली आहेत. अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्य़ाचा दौरा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही, असेच यातून दिसून येते. मुख्यमंत्र्यांनाही दखल घेतली नाही. अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने मुख्यमंत्र्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी केली.