भाजपचे आ. गिरीश महाजन यांचा आरोप

नगर : औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. केवळ तेथील निवडणुकासमोर ठेवून मतदारांना कशा भूलथापा मारायच्या, त्यांना कशी भुरळ टाकायची, त्यासाठी हा सर्व प्रयत्न सुरू आहे. औरंगाबादच्या नागरिकांना आठ-आठ दिवस पिण्याच्या पाण्याची वाट पाहावी लागते. यावरून लक्ष दूर हटवण्यासाठी नामांतराचा मुद्दा शिवसेनेने काढला आहे, असा आरोप भाजपचे माजी मंत्री डॉ. गिरीश महाजन यांनी केला.

ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी महाजन आज, शनिवारी नगरला होते. तत्पूर्वी त्यांनी व खा. डॉ. सुजय विखे यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली नंतर ते नगर मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

या वेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पक्षाचे प्रदेश सदस्य भानुदास बेरड, शहराध्यक्ष भय्या गंधे, सुनील रामदासी, सचिन पारखी आदी उपस्थित होते.

नामांतराच्या मुद्दय़ावर महाजन म्हणाले, शिवसेना सध्या भूमिका रोज बदलत आहे. शिवसेनेची कोणतीही स्वत:ची मूल्य राहिलेले नाहीत, शिवसेनेला सध्या कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे. त्यासाठी त्यांना सर्व पक्षांना सोबत घेऊन जायचे आहे. त्यामुळेच बोलायचे एक आणि करायचे दुसरे, ही भूमिका त्यांची आहे. मागील काळात शिवसेना आमच्यासोबत होती. त्या वेळेस त्यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी आग्रह करायचा होता. मात्र त्या वेळी शिवसेना काही बोलली नाही. आता मात्र निवडणुकासमोर बघून मतदारांना कशा भूलथापा मारायच्या, त्यांना कशी भुरळ टाकायची, त्यासाठी हा सर्व प्रयत्न चालवला आहे. शिवसेनेकडे राज्यातील सत्ता आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत. आता त्यांनी औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर करण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल. परंतु शिवसेना दाखवते वेगळे आणि करायचे काहीच नाही, अशा पद्धतीने काम करते.

शिवसेनेचे खुर्चीसाठी वाटेल ते!

नामांतराच्या मुद्दय़ावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे विचार पूर्व-पश्चिम आहेत. तरीसुद्धा त्यांनी युती केली. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शिवसेना काही करू शकते, हे आपण या माध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नामांतराच्या मुद्दय़ाचे फार घेणेदेणे नाही. ही फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची घोषणाबाजी चालली आहे. ते शेवटच्या क्षणी तडजोड करतील, असा आरोपही महाजन यांनी केला.

शिवसेनेचे खुर्चीसाठी वाटेल ते!

नामांतराच्या मुद्दय़ावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल का नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांचे विचार पूर्व-पश्चिम आहेत. तरीसुद्धा त्यांनी युती केली. सत्तेसाठी, खुर्चीसाठी शिवसेना काही करू शकते, हे आपण या माध्यमातून पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नामांतराच्या मुद्दय़ाचे फार घेणेदेणे नाही. ही फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची घोषणाबाजी चालली आहे. ते शेवटच्या क्षणी तडजोड करतील, असा आरोपही महाजन यांनी केला.

आधी ‘ईडी’ला हिशेब द्या

एकनाथ खडसे यांनी कुठे जावे किंवा जाऊ नये ? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर मत व्यक्त करायचे कोणतेच कारण नाही. ईडीकडून अनेकांच्या चौकशा सुरू झाल्या आहेत. ईडी आधी चौकशी करते व दोषी आढळल्यानंतरच कारवाई करते. त्यामुळे विनाकारण वक्तव्य करणे चुकीचे आहे. ईडीने ज्यांना ज्यांना हिशोब मागितला आहे, तो त्यांनी दिला पाहिजे, असे महाजन म्हणाले.