भारताला अजुनही करोना विषाणूचा विळखा बसलेला आहे. महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये अजुनही करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींची दुकानं व व्यवसाय लॉकडाउन काळात बंद आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना राज्य सरकार व स्थानिक पोलीस प्रशासन E-Pass पुरवत आहे. मात्र E-Pass देताना सरकारी यंत्रणांमध्ये कोणतंही नियोजन नसल्याचा दावा करत भाजपा आमदार नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.

E-Pass च्या आधारावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात आरोग्य आणि क्वारंटाइन सुविधा ही मर्यादीत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांना उपचारासाठी कोल्हापूर किंवा गोव्याला पाठवावं लागत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी मिळाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला सिंधुदुर्गात प्रवेश करण्यासाठी पास देऊ नका अशा आशायचं पत्र जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सर्व महत्वाच्या शहरांतील पोलीस आयुक्तांना लिहंल आहे.

याच पत्राचा आधार घेत नितेश राणे यांनी जिल्ह्याची क्षमता नसताना E-Pass का देण्यात आले असा प्रश्न विचारला आहे. जे चाकरमानी सध्या गावाकडे निघाले आहेत त्यांना प्रशासन कोणत्या तोंडाने सांगणार आहे?? परिस्थिती अशीच राहिल्यास महाराष्ट्रात उद्रेक अटळ आहे अशी भीतीही नितेश राणेंनी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारचं प्रशासन नियोजनशून्य कारभार करत असल्याचंही राणेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.