ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका असून त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार रवी राणा यांनी केली आहे. मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंचीही हत्या होऊ शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. रवी राणा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे.

परमबीर यांना नारळ!
वाझे यांच्या निवासस्थानी झडती

ते म्हणाले आहेत की, “सचिन वाझेंनी तपासात एनआयएला जी माहिती दिली आहे त्यावरुन महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणारं नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच पुढे येईल”.

वाझेंच्या सरकारमधील ‘सूत्रधारां’ची चौकशी करा!

“ज्याप्रकारे हिरेन यांचा मृत्यू झाला त्यानुसार सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका आहे. ‘मातोश्री’ अडचणीत असून सचिन वाझेंच्या जीवाला धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. एनआयने पूर्ण लक्ष ठेवून संरक्षण दिलं पाहिजे,” अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. “देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे,” असा दावा रवी राणा यांनी केला आहे.