राज्यात सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय चांगलाच चर्चेत असताना महाविकास आघाडीत एकमत नसून परस्पर विरोधी वक्तव्ये केली जात आहेत. यावरुन भाजपा टीका करत असून महाविकास आघाडी नाटक कंपनी असल्याचे म्हणत आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नामांतराचं समर्थन केले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मात्र विरोध कायम असल्याचं सांगत आहे. त्यातच आता भाजपा खासदार उदयनराजे भोसेल यांनी नामांतराच्या वादात उडी घेतली आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. "औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय लोकच घेतील. बॉम्बेचे मुंबई केले तसे औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा निर्णय लोक भावनेतूनच व्हावा. औरंगाबादचे नामांतरण करताना राज्यात उद्रेक होणार नाही याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे," असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं. संभाजीनगर उल्लेख योग्य म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला ठणकावलं; म्हणाले. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. यावर बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, "नामांतर करताना कोणाचीही मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा". "छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे केवळ राजे होते म्हणून ते ओळखले जात नाहीत. जसे ते आमचे पूर्वज आहेत तसेच त्यांचा इतिहास वाचला तर त्यांची कर्तबगारी, हुशारी, निर्णयक्षमता आणि लोकहिताच्या निर्णयामुळे ते ओळखले जातात. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर व्हावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु ज्याप्रमाणे बॉम्बेचे मुंबई झाले. त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेल्या औरंगाबादच्या बाबतीत नाव बदलायचे की नाही याचा निर्णय लोकशाहीनुसार लोकच घेतील अशी अशी भूमिका स्पष्ट करत नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने विचार करावा," असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे. औरंगाबादच्या नामांतरावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले. मंत्रिमंडळात समावेशाबाबत उदयनराजे म्हणाले, "मला कोणी मंत्री करू शकत नाही. माझं मंत्रिमंडळ मी स्वतः निवडतो. माझे मित्र म्हणजेच माझे मंत्रिमंडळ आहे तेच माझे मंत्री आणि कॅबिनेट मंत्री आहेत".