अन्वय नाईक प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर भाजपा राज्य सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि अन्वय कुटुंबात जमिनीचे २१ आर्थिक व्यवहार केल्याचा दावा केला असत असताना खासदार नारायण राणे यांनी गंभीर आरोप केला आहे. मातोश्रीवर देवाण घेवाण करुन व्यवहार होतात असं नारायण राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या जमीन व्यवहारासंबधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आपण याबद्दल ऐकलं आहे. याची शहानिशा सरकार करेल अन्यथा हे सरकार गेल्यानंतर होणारच आहे. ठाकरे कुटुंबीयांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती, आता पार्टरनशिप आहे. देवाण घेवाण करुन व्यवहार होतात. कार्यकर्ते, आमदार, खासदारांना काही स्थान नाही. थेट मातोश्रीवर व्यवहार करा आणि कामं करुन घ्या”.

“मुख्यमंत्रीदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही. पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्यापलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. राज्याचा त्यांना अभ्यास नाही,” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. “लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असं नारायण राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.

“महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार,” नारायण राणेंचं मोठं विधान

नारायण राणे यांनी यावेळी फटाके फोडण्यावर राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधावरुनही टीका केली. “दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा मी नाही. सण साजरे करण्यात तुम्ही व्यत्यय आणता. सगळीच लहान मुलं, मोठे लोक फटाके वाजवून आनंद लुटतात. तोदेखील तुम्ही घेऊ देत नाही. फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

“शिवसेना शब्द पाळते असं मला वाटत नाही. भाजपासोबत युती असताना दिलेले शब्द कुठे पाळले, गद्दारी का केली मग? भाजपा केवढा मोठा पक्ष आणि शिवसेना कुठे. बिहारमध्ये शिवसेनेची काय दैना झाली..एकाचं तरी डिपॉझिट वाचवू शकले का? भाजपासोबत शिवसेनेने कोणतीही बरोबरी करु नये. महाराष्ट्र सोडून कुठेही त्यांची चांगली स्थिती नाही. महाराष्ट्रात दे ५६ आले त्यासाठी भाजपाच कारणीभूत आहे. बिहारमध्ये उमेदवार उभे केले, ५० जणांचं डिपॉझिट जप्त झालं याची लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने टीका करणं आता बंद करावं,” असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

“नुसतं जळत राहणं, बोटं मोडत राहणं याशिवाय शिवसेनेने काही केलेलं नाही. महाराष्ट्रात शिवसेनचं काय अस्तित्व आहे. आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. विकासकामं ठप्प आहेत. शेतकऱ्यांना पैसे मिळू शकत नाहीयेत. मदत जाहीर केली पण दिली नाही. जिल्ह्याला मिळणारे विकासाचे पैसे जात नाही आहेत. सिंधुदुर्गाची वाईट अवस्था आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाचं श्रेय नरेंद्र मोदींचं असल्याचं सांगितलं. “बिहार निवडणुकीत आणि भारतात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत्या त्या सर्व ठिकाणी भाजपाला यश मिळालं आहे, हे यशाचे मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे काम केलं त्याबद्दल जनतेने त्यांना हे श्रेय मिळवून दिलं. मोदी, अमित शाह, जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मेहनीतेचं ते फळ आणि यश आहे असं मला वाटतं,” असं ते म्हणाले आहेत.

“नितीश कुमार तीनवेळा मुख्यमंत्री झाले आहेत. ते विश्वासू आणि कर्तबगार आहेत. त्यांच्यावर विश्वास टाकला आहे हे चुकीचं म्हणणार नाही. योग्य व्यक्तीला मुख्यमंत्री पदावर बसवलं आहे,” असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं.