भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटाली यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र चोरल्याचा आरोप केला असून यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील उत्तर दिलं असून एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना संपादकीयमधून पत्र चोरताना खोलीत भाजपाचे कोण नेते होते? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. यावरुन भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी आता उत्तर दिलं आहे. सामनामधून काय टीका झाली- "अजित पवार मोठय़ा पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपाचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा," अशी मागणी शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. “शरद पवारांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी…”, चंद्रकांत पाटलांचं अजितदादांना प्रत्युत्तर निलेश राणेंचं ट्विट संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का? अशी विचारणा निलेश राणे यांनी केली आहे. "संजय राऊतांनी कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसरं, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही," अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटमधून केली आहे. संज्याने कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेला आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसर, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही. — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 8, 2021 चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं होतं ? "महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती, कारण त्यांना काही बोललो नव्हतो. परंतु त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे. १४ महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवार साहेबांच्या ड्रॉवरमधून चोरून ५४ आमदारांची यादी राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते, तरीही ते शहाणपणा शिकवतात,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती. “अजितदादा पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरत असताना खोलीत भाजपाचे कोण लोक होते?” संजय राऊतांनी काय उत्तर दिलं- “ते पत्र चोरण्यास कारण काय? पत्र चोरल्याचा आरोप भाजपाने केला आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा जुनी जळमटं काढून फेकून द्यायला हवी होती. पण भाजपाचे सहकारी त्यातून बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्या मनाला हा विषय फार लागला आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. “चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा आहे. एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे,” असंही ते म्हणाले आहेत.