महाराष्ट्रात लॉकडाउन १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय ठाकरे सरकारने जाहीर केला आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ठाकरे सरकारने निर्बंधांमध्ये वाढ केली असून परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला आहे. दरम्यान लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई मॉडेल इतकं यशस्वी आहे तर मग मुंबईकरांना अजून १५ दिवसांची शिक्षा कशासाठी? अशी विचारणा त्यांनी टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. "ठाकरे सरकारकडून गाजावाजा केले जाणारे मुंबई मॉडेल इतकंच यशस्वी असेल तर लॉकडाउन का वाढवत आहेत माहिती नाही. मुळात आकड्यांची फसवाफसवी सुरु असून आजही लोकांना ऑक्सिजन मिळत नसून, बेडसाठी पैसे द्यावे लागत आहेत. रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. सत्य परिस्थिती माहिती असल्याने सरकारची लॉकडाउन काढण्याची हिंमत होत नाही. लॉकडाउन वाढवणं म्हणजे करोनाची स्थिती गंभीर आहे याची अप्रत्यक्ष कबुली आहे," असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. "मुंबई मॉडेलचा इतका गवगवा करत आहेत, इतकी बोंबाबोंब करत आहेत तर मग मुंबईत निर्बंध कमी का करत नाही? मुंबईकरांना अजून १५ दिवसांची शिक्षा कशासाठी? मुंबईत व्यापार, व्यवसाय का सुरु करत नाही? सगळ्या गोष्टी नियंत्रणात आहेत तर निर्बंध उठवा ना.करोनाचे आकडे दाखवत असून, खोटं बोलत आहोत यावर राज्य सरकारनेच शिक्कामोर्तब केलं आहे," असंही ते म्हणाले. "नुसतं प्रसिद्धीसाठी पैसे खर्च केले जात असून खोटं बोलत सत्य परिस्थिती लपवली जात आहे. लोक आर्थिक परिस्थितीमुळे मरत असताना लॉकडाउन का उठवला जात नाही? अजून १५ दिवसांनी पावसाळा सुरु होईल. सगळं नियंत्रणात आलं आहे तर लोकांना कमवू दे," अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सर्व प्रेम मुंबईवर, मग ग्रामीण भागातील लोकांना काय करायचं? अशी विचारणाही त्यांनी केली.