सांगली जिल्ह्य़ात भाजपने बाळसे धरले असले तरी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांपासून अनेक पदाधिकारी हे पूर्वश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. नगरपालिका निवडणुकीतील कामगिरीनंतर भाजपला जिल्हा परिषदेचे वेध लागले असून सत्तेचा सोपान गाठण्याकरिता विविध पक्षांमधील बडे मासे गळाला लावण्याचे प्रयत्न होत आहेत. काहीही करून काँग्रेसच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सांगली शहराचे आमदार सुधीर गाडगीळ हे मूळचे भाजपचे. खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) आणि आमदार विलासराव जगताप (जत) हे दोघेही मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेसुद्धा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी. राष्ट्रवादीतील नाराजांनी भाजपचा आसरा घेतला आणि बघता बघता पक्ष जिल्ह्य़ात वाढला. राष्ट्रवादीप्रमाणे भाजपमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले. खासदार संजयकाका पाटील आणि जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला होता. जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि पक्षांतर्गत घडामोडी सुरू झाल्या आहेत. भाजप हा पांढरपेशा पक्ष आहे, हा समज आजही ग्रामीण भागात कायम आहे. म्हणूनच हे चित्र बदलण्याकरिता भाजपने राष्ट्रवादीचीच नीती वापरण्यावर भर दिला आहे. यल्लम्मा यात्रेच्या निमित्ताने आर. आर. आबांच्या नावाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी समितीने केले आहे. या तीन दिवसांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. मात्र निमंत्रणपत्रिकेवर आणि प्रदर्शनाच्या स्वागत कमानीवर आबांचे छायाचित्र लहान लावण्यात आले, मात्र भाजप नेत्यांची छायाचित्रे मोठी लावण्यात आली. यावरून अध्यक्षा स्नेहल पाटील यांनी आगपाखड करताच निमंत्रणपत्रिका एका रात्रीत बदलण्यात आली, मात्र एवढय़ावरच न थांबता दहा लाखांचे अनुदान रोखण्याबरोबरच स्वतंत्र प्रदर्शन सांगलीत भरविण्याबरोबरच सभापतींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या सर्व घडामोडी जिल्हा परिषदेच्या सभेत सुरू असताना राज्यमंत्री खोत यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात फायली उघडल्या तर पळता भुई थोडी होईल असा सूचक इशारा राष्ट्रवादीच्या मंडळींना दिला. राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारीवाटपात आपल्या भूमिकेला सहकार्य करणाऱ्यांना संधी दिली. पक्षनिष्ठा बाजूला ठेवत सत्तेत सहभाग दिला. याच धर्तीवर जिल्हा बँक, बाजार समिती निवडणूक लढविली. काँग्रेस वगळता अन्य विरोधी पक्षातही आपलेच मित्र असावेत अशी त्यांची राजकीय पेरणी राहिली आहे. आता हीच पेरणी पक्षाच्या मुळावर उठली तरी दोष कुणाचा, असा सवाल राष्ट्रवादीतूनच केला जात आहे. राज्यात आघाडीचे शासन होते त्या वेळी जत, मिरज, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी तालुक्यांतून दुष्काळी गट स्थापन करण्यात आला होता. त्यांचा थेट संपर्क माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी होता. यामुळे त्यांना राजकीय आशीर्वाद एका अर्थाने पवारांचाच होता. भाजपच्या या प्रयोगामुळे मूळ राष्ट्रवादीवाले आणि फुटून निघालेले किंवा भाजपचे वेध लागलेले राष्ट्रवादीवाले यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात भाजपच्या नेत्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न कृषी समितीच्या सभापतींना केल्याने राष्ट्रवादीमध्ये त्याची साहजिकच प्रतिक्रिया उमटली. राष्ट्रवादीच्या या फुटीवर असलेल्या मंडळींना कृषी खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे.