करोनाची रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी नागपूर शहरात एक आठवड्याचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. मात्र आता या लॉकडाउनला भाजपाने विरोध दर्शवला आहे. आपलं अपयश लपवण्यासाठी प्रशासनाने हा लॉकडाउन केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. या लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होणार असून कोणत्याही लोकप्रितिनिधींना विश्वासात न घेता अधिकाऱ्यांनी बनवलेली प्रेसनोट वाचून या लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केलाय.

राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील या लॉकडाउनच्या मुद्द्यासंदर्भात पक्षाची भूमिका ‘एबीपी माझा’शी बोलताना स्पष्ट केली.  “महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हे आपलं इतर काहीही काम नसून केवळ लॉकडाउन करणं आपलं काम आहे या भूमिकेमध्ये असतात,” असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. “नागपूरमध्ये साधारणपणे डिव्हिजनल कमिशनर, कलेक्टर, कमिश्नर यांनी तयार केलेली प्रेसनोट वाटून लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय,” असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

कोणालाही विश्वासात घेतलं नाही

नागपूरमधील या लॉकडाउनची घोषणा करताना एकाही लोकप्रितिनिधीला विश्वासात घेण्यात आलं नाही. आमदार, खासदार, जिल्हा परिषदा किंवा नगरसेवक कोणालाही यासंदर्भात विश्वासात घेतलं नाही, असा आरोपही बावनकुळे यांनी केलाय. “लॉकडाउनपूर्वी अधिकाऱ्यांनी मार्केटबद्दल विचारणं गरजेचं होतं. नागपूरमधील सेमी अर्बन भागामध्ये रोज लाखो शेतकरी भाजीपाला आणतात. 12 बलुतेदार या ठिकाणी हातावर पोट भरतात. शेतकऱ्याच्या पोटावरही पाय पडणार आहे याचा किती विचार लॉकडाउन करताना झालाय?, नागपूर ग्रामीणचे शेतकरी दूध आणि भाजीपाल्याची बाजारपेठ संभाळतात. लॉकडाउन हा काही पर्याय आहे का?” असा प्रश्न बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.

थेट लॉकडाउन करुन टाकायचा हा कोणता नियम आहे?

“वाढती रुग्णसंख्या कंमी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये काय करता येईल, सोशल डिस्टन्सिंग लोकांनी पाळावं म्हणून काय करता येईल याबद्दल प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. लोकं ऐकतात पण प्रशासनाने ज्या पद्धतीने पुढाकार घेतला पाहिजे तसा घेतला नाही. पालकमंत्र्यांनी झोनच्या हिशोबाने, तहसीलाच्या हिशोबाने बैठका घेणे आवश्यक आहे. नेमकं प्रशासनाला काय आणि कसं काम केलं पाहिजे याचं नियोजन हवं. प्रशासनाला कामला लावलं पाहिजे. कोणालाही कामाला लावायचं नाही. अधिकाऱ्यांचंही फावलं होतं आपलंही फावलं होतं. त्यामुळे लॉकडाउन करुन टाकायचा आणि लोकांना त्यांच्या भरोश्यावर सोडून द्यायचं एवढचं सुरु आहे. कडक निर्बंध करावेत. पण थेट लॉकडाउन करुन टाकायचा हा कोणता नियम आहे?”, अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी या लॉकडाउनला विरोध केलाय. कुणालाच विचारता न घेता लॉकडाउन कसा जाहीर केला जातो असा संतप्त सवालही बावनकुळेंनी उपस्थित केलाय.

अधिकाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत रहायचं आहे

“नागपूर महानगर पालिकेतील तीन पालकमंत्री आणि इतर मंत्री नागपूरमध्ये आहेत. महानगरपालिकेची बैठक घेऊन त्यामध्ये या मंत्र्यांनी भूमिका मांडायला हवी होती. अनिल देशमुख, सुनिल केदार, नितीन राऊत आहेत. यांनी कधी जनतेला काही संदेश दिला का?, कधी महापालिकेमध्ये जाऊन त्यांनी आढावा घेतला का?, त्यांनी एकही एकत्रित बैठक घेतली नाही. तिथल्या आमदारांची, नगरसेवकांची बैठक घेतली का त्यांनी? कधी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना कामं नेमून दिली का? लॉकडाउनच्या आधीच वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचं नियोजन मंत्र्यांनी केलं नाही. प्रेस नोट आली की वाचायची काम मंत्र्यांनी केली आणि लॉकडाउन जाहीर केला. अधिकारी आपल्या घरी मस्त राहतात आणि जनता वाऱ्यावर. लॉकडाउनच्या नावाने अधिकारी घरी बसलेत त्यांना आपल्या कुटुंबासोबत रहायचं आहे,” असंही बावनकुळे म्हणाले.