महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील असं सांगितलं आहे. दरम्यान भाजपा नेते आणि अन्न व नागरी पुरवठा राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्या जाणार का ? असा सवाल विचारला आहे. तसंच पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत असा टोलाही लगावला आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, “निमंत्रण आले नाही तरी राम भक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार का ? हवं तर सरकारमधील सहकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांनी अयोध्येत जावं. प्रभू रामासाठी मानपान कसला. पहले मंदिर फिर सरकार म्हणणारे उद्धव ठाकरे आता पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहे”. उद्धव ठाकरे सर्व पातळीवर नापास झाले असून हे नापासांचं सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.

“धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं”, उद्धव ठाकरेंना आवाहन

उद्धव ठाकरे भूमिपूजनासाठी अयोध्येत जाणार का? संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “अयोध्येला उद्धव ठाकरे नक्की जातील. शिवसेनेचं या विषयाशी एक भावनिक, धार्मिक आणि राजकीय नातं जोडलेलं आहे. आज जे भव्य राम मंदिर आणि सोहळा होत आहे त्यातील अडथळे दूर कऱण्यासाठी शिवसेनेनं मोठं योगदान दिलं आहे, रक्त सांडलं आहे. मी काल सांगितलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजेच सरकारचे १०० दिवस झाल्यावरही गेले होते,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला -संजय राऊत

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी ट्विट करत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं टाळावं असं आवाहन उद्धव ठाकरेंना केलं आहे. माजिद मेमन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलेल्यांमध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश आहे. करोनाच्या नियमांचं पालन करत उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात. पण धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी अशा धार्मिक कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्यापासून दूर राहावं”.