राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्योतिषी म्हणून उल्लेख केल्यानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी तीन महिन्यात राज्यात भाजपाचं सरकार येईल असा दावा केला आहे. यासंबंधी शरद पवारांना विचारलं असता त्यांनी दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हतं असा टोला लगावला होता. रावसाहेब दानवे यांनी यावर बोलताना माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“माझ्यावर टीका करण्याचा शरद पवारांना आधिकार आहे. ते या महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला एक गोष्ट कळते की या राज्यातला कारभार आणि कारभारावर जनता नाराज आहे. हा माझ्या भविष्याचा प्रश्न नाही,” असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. राज्यात भाजपाचं सरकार येणार असल्याच्या दाव्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “दोन महिन्यात सरकार येईल. पण सरकार कसं येईल याचं नियोजन तुम्हाला कसं सांगू?”.

आणखी वाचा- कार्यकर्ते, आमदारांमध्ये चलबिचल नको म्हणून भाजपा सरकार पाडण्याचं गाजर दाखवतंय – अजित पवार

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी आणि भाजपाचा काय संबंध? रावसाहेब दानवेंनी केला खुलासा

शरद पवारांनी काय म्हटलं होतं –
“रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. पण त्यांचा हा गुण मला माहित नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळालं,” असा टोला शरद पवारांनी लगावला होता.