विधान परिषदेच्या निवडणुकीआधीच एकनाथ खडसे विरुद्ध भाजपा असं समीकरण दिसू लागलं आहे. विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्या खडसे यांना भाजपानं उमेदवारी दिली नाही. त्यामुळे संतापलेल्या एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर आरोप करत आपली नाराजी व्यक्त केली. खडसेंच्या आरोपानंतर भाजपानंही आक्रमक पवित्रा घेत खडसे यांना काही प्रश्न विचारले आहे. "मुलगा आणि सुनेसाठी उमेदवारांची तिकीटं कापत तुम्ही त्यांच्या पाठित खंजीर खुपसला नाही का?," असा सवाल भाजपानं खडसेंना केला आहे. आणखी वाचा- RSS च्या अजेंड्यात नाथाभाऊ न बसल्याने तिकिट नाकारलं – चंद्रकांत पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपानं विधान परिषद उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची नाराजी माध्यमांशी बोलताना बाहेर आली. एका मुलाखतीत त्यांनी तिकीटं न मिळण्याबद्दल राज्यातील भाजपा नेत्यांना जबाबदार ठरवलं आहे. खडसे यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली. आणखी वाचा- ‘देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?’ एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला. एकनाथ खडसे यांना उमेदवारी का नाकारण्यात आली, याची कारणं सांगता येणार नाही, असं सांगितलं. त्याचबरोबर भाजपानं पाठित खंजीर खुपसल्याच्या आरोपाला उत्तर देताना पाटील म्हणाले,"नाथाभाऊंनी पक्षासाठी काम केलं, पण त्यांना काय मिळालं नाही. सात वेळा आमदारकी मिळाली. दोन वेळा मंत्रिपद मिळालं. सुनेला दोन वेळा खासदारकी मिळाली. मुलगी जिल्हा बँकेची चेअरमन आहे. आणि तुम्ही हरिभाऊ जावळेंचं केंद्रीय संसदीय मंडळानं घोषित केलेलं तिकीट कापून सुनेला दिलं, तेव्हा जावळेंच्या पाठित खंजीर नाही खुपसला? तुम्ही जगवानीचं तिकीट कापून मुलाला विधान परिषदेचं तिकीट दिलं, तेव्हा जगवानीच्या पाठित खंजीर नाही खुपसला का? आज मी जे जे म्हणतो, ते काहीही असेल ते चालेल, असं नाही. मनाला क्लेश होतोय. पक्षातील भांडणं लोकांसमोर कुणी आणले?," असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना केला.