शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद हा निव्वळ कांगावा असल्याचं आता भाजपाचे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ईडी ने पाठवलेल्या नोटिशीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा होता. ईडीने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असं वाटत असेल तर संजय राऊत यांनी ईडी विरोधात खुशाल न्यायालयात जावं असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे. उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, " संजय राऊत यांची पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त कांगावा करण्यासाठी होती. राजकीय षड्यंत्र वगैरे गोष्टी बोलण्यापेक्षा राऊत यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आलेल्या नोटिशीबाबत ईडी कडे समाधानकारक उत्तर सादर करावे. ईडीने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असेल तर राऊत यांना ईडी विरुद्ध न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे." "सोमवारी सकाळपर्यंत नोटीस मिळालीच नाही असे म्हणणाऱ्या राऊत यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषद घेण्याऐवजी त्यांनी नोटीस का बजावली गेली? यामागच्या कारणांचा शोध घ्यावा व ईडी पुढे आपले म्हणणे सादर करावे.तसे करण्याऐवजी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा करण्याचा मार्ग स्वीकारला", असेही केशव उपाध्ये यांनी नमूद केले. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितलं आहे. मी जर ठरवलं तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखं परदेशात पळून जावं लागेल. भाजपाची काही माकडं अकारण उड्या मारत आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.