मराठा आरक्षणासाठी वेगेवगळ्या पक्षातील रथी, महारथी आहेत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. आपण यासाठी अनेकदा मागणी केली असून विनंतीही केली असल्याचं ते म्हणाले आहेत. इच्छा असेल तर साष्टांग नमस्कार घालण्याचीही माझी तयारी आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. जसं इतर जाती-जमातींसाठी करता त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठीही प्रयत्न करा अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. सातऱ्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

“आजवर अनेक जाती, समाजाला आरक्षण दिले, कुणाला नव्याने हवे आहे. पण या आरक्षणामुळे सगळा देश, समाज जातीजातीत वाटला जात आहे. समाजात कटुता निर्माण झाली आहे, एक राष्ट्र म्हणून हे खूप वाईट,” असल्याची भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली.

उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आपलं परखड मत मांडलं. “मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं. मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे. आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्याची,” खंतही उदयनराजे यांनी बोलून दाखवली.

आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाल्याची खंत व्यक्त करत उदयनराजे म्हणाले, की “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती-पाती मानल्या नाहीत आणि तसे शिकविलेही नाही. त्यांनी व्यक्तीच्या गुणवत्तेला महत्त्व दिले. मी स्वत:ला कधी मराठा म्हणून घेत नाही. मी सर्व जाती-समाज आपलाच मानतो. पण आज या वाढत्या आरक्षणामुळे माणसे दुरावली जात आहेत. सगळा समाज कप्प्यांमध्ये वाटला जात आहे. कधीतरी आपल्याला गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. यातच आपल्या देशाची प्रगती दडलेली आहे. या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. लहानपणापासूनचे जिवाला जीव देणारे मित्र दूर झाले. एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मराठा समाजातीलही अनेकांना आधाराची गरज आहे, त्यासाठी आरक्षणाची मागणी आहे. त्याचा विचार व्हायला हवा. परंतु हा प्रश्न न सुटण्यामागे मराठा समाजातील नेते आणि संघटनांमध्ये असलेला अहंभावच कारणीभूत आहे”.

जीवाला जीव देणारे सख्खे मित्र दूर झाले –
“माझ्याकडे सर्व जाती धर्माचे लोक कार्यरत आहेत. लहानपणी गोट्या, विटया दांडू खेळायचो तेव्हा तुम्ही जात पहायचात का?? या आरक्षणामुळे लोक एकमेकांशी बोलण्याचे बंद झाले. लहानपणापासूनचे जीवाला जीव देणारे सख्खे मित्र दूर झाले. एकमेकाकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. या आरक्षणामुळे सर्व समाजात उद्रेक होईल. अमेरिकेत वर्णभेदातून जसा उद्रेक झाला तसा आपल्याकडे होईल. तर सगळ्याच गोष्टीचे राजकारण करायचे नसतं. राजकारण केलं असतं तर मागेच आरक्षण मिळाले असतं,” असंही उदयनराजेंनी म्हटलं.